त्यांना फक्त थोडे प्रेम हवे

   सखुआजी आता थोडी थकली होती. वयाने नाही तर मनाने. साठ वर्षांच्या आसपास होती ती. गावी आजी अन् आजोबा दोघच राहायचे. सखुआजीच्या नवऱ्याला सारा गाव नाथा आजोबा म्हणून ओळखत असे.


   नाथा आजोबा म्हणजे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. अवघे आयुष्य नाकासमोर चाललेला माणूस. त्यांच्या शब्दाला गावात मान होता. गावी त्यांची पाच एकर शेती होती. पण आजी आजोबांनी शेतीमध्ये अपार कष्ट घेतले आणि पाच एकराची दहा एकर शेती केली.


     सुधाकर त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला त्यांनी भरपूर शिकवले. त्याला चांगली नोकरी लागल्यावर तो नोकरीनिमित्ताने शहरात स्थायिक झाला होता. शहर तसे फार दूर नव्हते पण वेळ मिळत नसल्याच्या सबबी देऊन तो फारसा गावी येत नसे. तो वर्षातुन एकदा गावी त्याच्या मुलाबाळांसह चक्कर मारायचा.


    सखू आजी चातकाप्रमाणे सुधाकरच्या येण्याची वाट बघायची. तिला नेहमी वाटायचं आपण सुद्धा सुधाकर सोबत राहायला हवं. तसा सुधाकरसुद्धा एक दोनदा त्याच्या वडिलांना बोलला होता की गावातील सगळी जमीन विकून तुम्हीसुद्धा शहरात राहायला चला म्हणून. पण नाथा आजोबांनी त्याला नकार दिला.


    संपूर्ण आयुष्य ज्या गावात राहिले त्या गावाशी त्यांची घट्ट नाळ जोडली गेली होती. तिथून बाहेर निघायला त्यांचे मन धजावत नव्हते. दोघेही आजी आजोबा या वयात देखील शेतीकडे भरपूर लक्ष देत असत. त्यामुळे त्यांना पैशांची कधीच अडचण भासली नाही.


   उलट सुधाकर आला की नाथा आजोबा त्याच्या हातात काही ना काही रक्कम ठेवायचे. आजीची मुलाकडे राहायची इच्छा सोडून कुठलीही इच्छा आजवर अपुरी ठेवली नव्हती नाथा आजोबांनी.  पण सखुआजीला मात्र या गोष्टीमुळे आजोबांचा खूप राग आला होता.


   तिची मनोमन इच्छा होती सुधाकर सोबत शहरात राहायला जायची. मुलगा, सून आणि नातवंडं यांच्यात रमून जायचं होतं तिला. पण आजोबा काही तयार होत नव्हते. आणि त्यांना एकट्याला सोडून आजी जाऊ शकणार नव्हती म्हणून तिची खूप चिडचिड व्हायची. 

  
   आजोबांनी तिला बरेचदा समजावून सांगितले पण शेवटी आईचं काळीज ते. पोराच्या ओढीनं तिचे डोळे भरून येत असतं. त्यामुळे ती आता आजोबांशी सतत हटकून वागायची. त्यांचा राग राग करायची. आयुष्यभर नवऱ्याला एकही उलट शब्द न बोलणारी सखू आजी आता मात्र येताजाता आजोबांना सूनवायची. आजोबांना मात्र तिच्या मनाची घालमेल कळत होती. पण त्यांचाही नाईलाज होता. त्यांना गाव सोडवत नव्हते.


    असेच दिवस चालले होते. एके दिवशी नाथा आजोबा शेतात चक्कर येऊन पडले. सखू आजींची आरडाओरड शेजारच्या शेतातील मजूर धावत आले आणि आजोबांना तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी आजोबांना मृत घोषित केले.


   कुंकवाचा धनी असा एकटीला माघारी सोडून गेल्याचे आजींना खूप दुःख झाले. गावातल्या लोकांनी सुधाकरला फोन लावून आजोबांच्या जाण्याची बातमी सांगितली. इतर नातेवाईकांना सुद्धा कळवण्यात आले. आजोबांचे सर्व विधी पार पडले.


   तेरावा दिवस झाल्यावर सुधाकर ने आजीला त्याच्या सोबत शहरात राहायला ये अशी गळ घातली. आजिंची तर खूप दिवसांची इच्छा होती मुलाकडे राहायची. सुधाकर आजीला सोबत घेऊन गेला. सखू आजी मनोमन सुखावल्या. मुलाच्या सहवासात राहण्याच्या कल्पनेने आजोबांच्या जाण्याचे दुःख फार हलकं वाटायला लागले आजींना.


    आजी मुलाकडे राहायला आली होती. घरातील एक अडगळीची खोली थोडी साफ करून आजींना देण्यात आली. आजी त्यात देखील समाधानी होती. आजी खूप आनंदाने तिच्या नातवंडांशी आणि सूनेशी बोलत होती. आजींचा आनंद तिच्या चेहऱ्यावर अगदी ओसंडून वाहत होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही.


    रात्री आजीच्या सूनबाईने आजीच्या जेवणाच ताट आजीच्या खोलीत आणून दिलं. आजीला तिच्या खोलीतून सुधाकर आणि त्याच्या बायकामुलांचा डायनिंग टेबलवर जेवतानाचा संवाद अगदी स्पष्टपणे ऐकू येत होता.


   सर्वजण आनंदात जेवत होते. पण आजीला मात्र त्यांनी त्यांच्यासोबत जेवायला बोलावले नाही. आजीला वाटलं ती  इथल्या वातावरणात अगदी नवीन आहे म्हणून सर्वांना समजून घ्यायला थोडा वेळ लागेल. आजी स्वतःचीच समजूत काढत होती. पण हा दिनक्रम आता रोजचाच बनला होता. आजीला रोजच खोलीत ताट आणून दिले जायचे. पुढे पुढे तर ताटात ताज्या अन्नापेक्षा शिळे अन्नच जात यायला लागले. घरी पाहुणे येणार असले की आजीला सौम्य शब्दात खोलीतून बाहेर न निघण्याची ताकीद मिळायची.


    आजी तिच्या नातवंडांशी गप्पा मारायला गेली की ते तिला टाळून निघून जात. सूनबाईसुद्धा अगदी मोजकच बोलायची. ते जिथे राहायचे तो फ्लॅट असल्या कारणाने शेजारी पाजारी जाऊन बोलायची तर पद्धतच नव्हती. आजी अधून मधून खाली बगीच्यात पाय मोकळे करायला जायची.


     एकदा आजी अशीच पाय मोकळी करायला बागेत गेल्या होत्या. तिथे काही वेळाने त्यांची सूनबाई देखील तिच्या मैत्रिणींसोबत आली. तिच्याकडे बघून आजीने तिला हाक मारली मात्र तिने साफ दुर्लक्ष केले. ती सखू आजीच्या शेजारून गेली पण आजीकडे ओळखीचा एक कटाक्ष देखील टाकला नाही.


    आजीला कसतरीच वाटलं. पण कुणाला काही बोलायची सोय नव्हती. कारण सासू आणि सूनेमध्ये कधीच मोकळा संवाद होत नसे. सुधाकर तर नेहमी कामातच असायचा. आजीचा जीव अगदी गुदमरल्यागत झाला होता.


    आता आजीला आजोबांची खूप आठवण येत होती. त्यांनी गावीच राहण्याचा निर्णय का घेतला ह्याचे कारण तिला कळले होते. पण आजीने मात्र त्यांना समजून न घेता त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांच्याशी हटकून वागली होती.


    आता आजीला परत गावी जाण्याचे वेध लागले होते. ती तिथे जाऊन कशीबशी एकटी राहिली असती पण इथे मात्र तिला कोंडल्यासारखे वाटत होते. इथे सर्व असूनही आजीला एकटं एकटं वाटत होतं. तिने सुधाकरशी याबाबत बोलायचे ठरवले. पण आजीला सुधाकरशी याबाबत बोलायला संधी मिळत नव्हती.


    इतक्यात एके दिवशी सुधाकर स्वतः आजीशी बोलायला तिच्या रूम मध्ये आला. त्याने आजीची विचारपूस केली. तो स्वतःहून आपल्याशी बोलायला आलाय म्हटल्यावर आजीला खूप बरे वाटले. आजीला वाटले आपण उगाच परत गावी जाण्याचा विचार करत होतो. आपल्या लेकाचं आपल्यावर खूप प्रेम आहे असे वाटून ती आनंदली.


   पुढील दोन तीन दिवस सर्वकाही खूप चांगलं सुरू होतं. आजीला आता सर्वांच्या सोबत जेवायला बोलावत असत. आजींची सून सुद्धा आजींशी प्रेमाने बोलत असे. आजी खूप खुश होती. पण तिच्या आनंदावर लवकरच विरजण पडले जेव्हा अनवधानाने तिने तिच्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकले.


    आजींची सून त्यांच्या मुलाला विचारत होती की तुम्ही गावाकडील शेत विकण्याच्या कागदांवर आजीची सही कधी घेणार म्हणून.


   त्या दोघांचे बोलणे ऐकून आजीला समजले की आजोबांनी गावातील शेत आणि घर आजींच्या नावाने केले होते. कदाचित त्यांना भविष्यातील गोष्टींचा अंदाज आधीच आलेला असावा. या वयात आजीला इतरांवर अवलंबून राहावे लागू नये म्हणून आजोबांनी ही तजवीज करून ठेवली होती. कदाचित त्यांनी सुधाकर ला आजींपेक्षा चांगल्या पद्धतीने ओळखले होते.


   नाथा आजोबांच्या शेता जवळूनच एक मोठा हायवे रोड बनणार होता. त्यामुळे शेताला चांगलीच किंमत भेटणार होती. त्यामुळे सुधाकरला खूप आधीपासूनच शेत विकायचे होते. त्या पैशांतून तो स्वतःचा व्यवसाय वाढवणार होता.


    पण आजोबांनी कधीच त्याला शेती विकू दिली नाही. निदान त्यांच्या जिवंतपणी तरी तो शेती विकू शकला नाही. पण आजोबा गेल्यानंतर सुधाकरने सखू आजीला स्वतः सोबत शहरात आणले तेव्हा त्याला वाटले की आता तो आरामात शेती विकून टाकेल.


   पण नाथा आजोबांनी सर्वकाही आजींच्या नावाने केलंय हे जेव्हा त्याला कळले तेव्हाच त्याने ठरवले की गोड बोलून आजींची सही मिळवायची आणि परस्पर शेती विकून टाकायची. त्यामुळेच मागच्या दोन तीन दिवसांपासून आजींना ही स्पेशल ट्रीटमेंट दिली जात होती.


    आजींनी सुधाकर आणि त्याच्या बायकोचे बोलणे ऐकले  तेव्हा तिला धक्काच बसला. सुधाकरने जर सरळ येऊन आपल्याला त्या कागदांवर सही करायला सांगितली असती तर कदाचित सही केली देखील असती. कारण तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्यांच्या माघारी त्या जमिनीवर त्याचाच अधिकार होता. पण तो स्वतःच्या आईच्या भावनांशी असा खेळेल ह्याची सखू आजी ने कल्पना देखील केली नव्हती.


    सखूआजीचे कुटुंबासोबत एकत्र राहण्याचे स्वप्न पार धुळीस मिळाले होते. जिथे पोटचा लेक केवळ स्वतःचा फायदा बघतोय तिथे सूनेकडून तरी काय अपेक्षा ठेवणार. त्या दिवशी रात्रभर सखुआजीचा डोळा लागला नाही. त्यांनी मनाशी काहीतरी ठरवले आणि पहाटेच स्वतःच सामान बांधून त्या कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडल्या. त्यांनी सकाळची पहिलीच गाडी पकडली आणि त्या थेट गावी पोहचल्या.


    गावातल्या घरात गेल्यावर आजीला खूप मोकळं वाटलं. कारण तिथेच आजोबांच्या आठवणी होत्या. त्यांच्या सुखी अन् समाधानी आयुष्याचं साक्षीदार असणार हे घरच आता सखुआजींच सर्वस्व होतं. आजीने घरात गेल्यावर सर्वात आधी देवासमोर दिवा लावला आणि नाथा आजोबांच्या फोटोला नमस्कार केला. तिला क्षणभर वाटले जणू आजोबा स्वतः फोटोमधून तिच्याकडे समाधानाने पाहत आहेत.

समाप्त.

ही कथा कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच काही हृदयस्पर्शी कथा इथे वाचा.

तू पण एक मुलगीच आहेस ना – भाग १

तिने आई मानलं पण तू सासुच राहिलीस…- भाग १

माझिया माहेरा

जगावेगळे नाते आपुले – भाग २

©®आरती लोडम खरबडकर.

अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या “मितवा” या फेसबुक पेज ला लाईक करा.
   
   

10 thoughts on “त्यांना फक्त थोडे प्रेम हवे”

  1. Amazing blog! Do you have any helpful hints for aspiring writers?
    I’m hoping to start my own blog soon but I’m a little lost on everything.
    Would you advise starting with a free platform like WordPress or go for a paid option? There
    are so many choices out there that I’m completely overwhelmed ..
    Any tips? Thanks!

    Reply
  2. What you published made a lot of sense. But, think about this, what if you were to create a killer
    post title? I am not saying your information is not good, but what if you
    added something to possibly grab a person’s
    attention? I mean त्यांना फक्त
    थोडे प्रेम हवे – मितवा is a little plain. You ought
    to glance at Yahoo’s home page and see how they write post titles
    to grab viewers to open the links. You might try adding a video or a related
    pic or two to get readers interested about what you’ve written. In my opinion, it could bring your website a little bit more interesting.

    Reply
  3. Does your website have a contact page? I’m having a tough time locating it but, I’d
    like to shoot you an e-mail. I’ve got some suggestions for your blog you
    might be interested in hearing. Either way, great blog and I look forward to seeing it expand over time.

    Reply
  4. Thanks for ones marvelous posting! I genuinely enjoyed reading
    it, you could be a great author. I will make certain to bookmark your blog and will eventually come back in the
    foreseeable future. I want to encourage yourself to continue your
    great writing, have a nice afternoon!

    Reply

Leave a Comment