मीनाक्षीला आज पार्लर चे काम संपवायला जरा उशीरच झाला होता. पार्लर चे काम आटोपून ती घाईघाईने ती हॉल मध्ये शिरली तेव्हा समोर आपल्या दोन्ही नणंदा पाहून आश्चर्यचकित झाली. त्यांना पाहून म्हणाली.
” रूपाताई, दीपाताई…तुम्ही कधी आल्यात…?”
” आताच आलोय वहिनी…तू कामात होतीस म्हणून तुला आवाज दिला नाही…” मोठी नणंद म्हणाली.
” हो का…तुम्ही बसा मी जरा चहा टाकते तुमच्यासाठी…” मीनाक्षी म्हणाली.
” चहा तर होतच राहील वहिनी…पण आम्हाला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे..” लहान नणंद म्हणाली.
” माझ्याशी…?? नेमकं काय बोलायचं आहे..?” मीनाक्षी ने आश्चर्याने विचारले.
” तू बाबांचा असा अपमान करशील असं आम्हाला वाटलं नव्हतं…?” मोठी नणंद म्हणाली.
” अपमान…? मी कधी केला बाबांचा अपमान…” आपल्या सारेबुवांकडे आश्चर्याची नजर टाकत ती म्हणाली.
” तू या घरात राहतेस म्हणजे बाबाच तुझा आणि तुझ्या मुलींचा सांभाळ करत आहेत ना…मग पार्लर मधून तू जे काही कमावतेस ते तुला बाबांच्या हाती द्यायला हवं ना…” मोठी नणंद म्हणाली.
” होय तर…मनोजच्या माघारी मीच सांभाळतोय ना तुम्हा तिघी मायलेकींना…मग तुला पैशांच काय काम आहे…” तिचे सासरे म्हणाले.
” वहिनी, बाबा चुकीचं काही बोलत नाहीयेत…कठीण काळात बाबांनीच तुम्हाला आधार दिलाय न…आणि घरात एकत्र राहायचं असेल तर सगळा व्यवहार बाबांनी सांभाळलेला बरा…” लहान नणंद म्हणाली.
हे ऐकून आधी आश्चर्यचकित झालेली मीनाक्षी आता रागाने धुमसत होती. शेवटी न राहवून ती म्हणाली.
“आधार..?” ती म्हणाली, “आधार म्हणजे काय? साधं मुलींच्या शाळेच्या फी साठी पैसे मागताना मला किती वेळा अपमान सहन करावा लागला ते माहिती आहे का तुम्हाला?…मासा नवरा गेल्यावर पैशांअभावी माझा मुलींची ट्युशन बंद करावी लागली मला. आजी पैशांची खरंच अडचण असती तर वेगळी गोष्ट होती. बाबांकडे शेतीचे चांगले उत्पन्न होते…आणि मला मिळालेले ह्यांच्या विम्याचे पैसे माझ्या आणि माझ्या मुलींच्या हक्काचे होते…मी ते मोठ्या विश्वासाने बाबांकडे दिले होते…
पण असं असूनही मला आणि आमच्या मुलींना साध्या साध्या गोष्टीसाठी ह्यांच्याकडे पैशांसाठी हात पसरावे लागायचे…गरजेच्या वस्तूंसाठी सुद्धा बाबांनी अनेकदा पैसे देण्याचे नाकारले. माझ्या मुलींची शाळा बदलून त्यांना साध्या शाळेत ऍडमिशन करून दिले बाबांनी…मी सगळं सहन केलं…शेवटी गरज म्हणून पार्लर चे काम चालू केले तेव्हा घरून कुणीच पाठिंबा दिला नाही…मी घरचे काम आवरुन पार्लर चे काम करते…चार पैसे कमवते…त्यामुळे माझ्या कष्टाचे पैसे मी कुणालाच देणार नाही…”
मीनाक्षी जीव तोडून बोलत होती आणि बाकी सगळे गप्प बसून ऐकत होते.
पण मग सासरे जरा रागाने म्हणाले, ” असं असेल तर मग वेगळं राहा!…या घरात रहायची सुद्धा काही गरज नाही..”
त्यांच्या बोलण्याने क्षणभर घरात शांतता पसरली.
मीनाक्षीने मुलींकडे पाहिलं. स्वरा आणि काव्या दरवाज्याजवळ उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात भीती आणि आईबद्दल अभिमान दोन्ही होतं.
ती पुढे सासरेबुवांना म्हणाली, “हो मी या घरात राहते कारण हे घर माझ्या नवऱ्याच सुद्धा आहे…आणि त्यामुळे ह्या घरावर माझा आणि माझ्या मुलींच्या सुद्धा हक्क आहे…आजवर जे झालं ते झालं पण ह्यापुढे मी माझ्या मुलींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. मी ह्या घरात नुसती पाहुण्यासारखी राहत नाही तर जबाबदाऱ्या सुद्धा पेलते. पण यापुढे मी माझ्या कष्टाचे पैसे मी कोणालाही देणार नाही. हे पैसे माझ्या मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी आहेत. आणि त्यावर इतर कुणाचाही हक्क नाही.”
हे बोलताना तिचा आवाज थरथरत होता, पण भीती नव्हती.
एवढं बोलून ती मुलींना घेऊन तिच्या खोलीत निघून गेली.
पावसाळ्याची ती रात्र होती. घराच्या कौलांवर पडणाऱ्या सरींचा आवाज संपूर्ण अंगणभर पसरला होता. मीनाक्षी खिडकीजवळ बसून पावसाकडे बघत होती. तिच्या मनात मात्र वर्षभरापूर्वीची ती काळी रात्र पुन्हा उभी राहिली होती—ज्या दिवशी तिचा नवरा मनोज अचानक अपघातात गेला आणि तिचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं.
मनोज गेला आणि सगळं बदललं.
ती तिच्या दोन चिमुकल्या मुलींना—स्वरा आणि काव्या—घेऊन सासरीच राहत होती. घरात सासू, सासरे आणि त्या तिघी. सुरुवातीला सगळे सांत्वन करत होते, पण दिवसेंदिवस परिस्थिती वेगळी वळण घेत गेली. मनोजच्या विम्याचे पैसे मिळाले तेव्हा मीनाक्षीला वाटलं होतं, आता किमान मुलींचं शिक्षण, भविष्यासाठी थोडा आधार मिळेल. पण ते पैसे सासऱ्यांनी स्वतःकडेच ठेवले.
” घरातल्या मोठ्यांच्या हातात पैसे असलेले बरे,” एवढंच त्यांनी सांगितलं होतं.
तेव्हापासून प्रत्येक छोट्या-मोठ्या गरजेसाठी मीनाक्षीला सासऱ्यांसमोर हात पसरावा लागायचा. मुलींच्या शाळेच्या फी साठी सुद्धा.
“बाबा, उद्या फी भरायची आहे,” ती संकोचत म्हणायची.
सासरे कपाळावर आठ्या घालत पर्स उघडायचे, काही मोजकेच पैसे देत म्हणायचे, “जपून खर्च कर. उगाच फाजील खर्च नको.”
ती गप्प बसायची. मनातले शब्द गिळून.
हळूहळू तिला जाणवायला लागलं—मनोज गेल्यावर ती या घरात केवळ जबाबदारी राहिली होती, व्यक्ती नव्हे.
सहा महिन्यांपूर्वी एका रात्री ती उशीवर डोळे लावून पडली होती. स्वरा म्हणाली, “आई, पुढच्या वर्षी मला डान्स क्लासला जायचंय. जाईन ना?”
त्या निरागस प्रश्नाने तिचं मन पिळलं गेलं. “हो ग बाळा,” ती म्हणाली, पण मनात विचारांची वादळं उठली. आज मनोज असता तर त्याने लगेच मुलीची इच्छा पूर्ण केली असती या विचाराने तिला रडू आलं.
दुसऱ्याच दिवशी तिने निर्णय घेतला. तिला आधीपासून थोडंसं ब्युटीपार्लरचं प्रशिक्षण होतंच. लग्नाआधी ती एका पार्लरमध्ये शिकायला जायची. पण लग्नानंतर कधी पार्लर suru करायची संधीच मिळाली नव्हती. पण आता मात्र तिला कामाची खूप गरज होती आणि पार्लरचे काम तिला जास्त सोयीचे वाटत होते. मग तिने घराच्या मागच्या खोलीतूनच छोटंसं पार्लर सुरू केलं.
सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. दोन-चार ग्राहक, थोडेसे पैसे. सासऱ्यांच्या चेहऱ्यावर नेहमी उपहास दिसायचा.
” काय मिळतंय या सगळ्यात सूनबाई? घरातली कामं करा आधी,” ते टोमणा मारायचे.
ती मात्र शांतपणे सगळं सांभाळत राहिली. पहाटे उठून घरकाम, मुलींची तयारी, मग पार्लरचं काम. तिच्या हातात गोडवा होता, कामात प्रामाणिकपणा. हळूहळू गावात तिची चर्चा होऊ लागली.
“मीनाक्षीच्या पार्लरला जा, छान काम करते,” बायका एकमेकींना सांगू लागल्या.
सहा महिन्यांत परिस्थिती बदलली. आता दिवसाला चांगली कमाई व्हायची. तिच्या हातात स्वतःचे पैसे यायला लागले. पहिल्यांदा तिने मुलींसाठी नवीन शाळेची बॅग आणि स्वतःसाठी एक साडी घेतली. बिल हातात धरताना तिचे डोळे भरून आले.
एक संध्याकाळी सासरे तिला बोलावून म्हणाले, ” मीनाक्षी बेटा, आता तुझं पार्लर चांगलं चालतंय म्हणे?”
ती शांतपणे म्हणाली, “हो बाबा, देवाच्या कृपेने सध्या बरं चालतंय.”
हे ऐकून ते सरळ म्हणाले, “मग पुढच्या महिन्यापासून सगळी कमाई माझ्या हातात दे. तुला पैशांच्या व्यवहाराबद्दल फार कळत नाही… आणि पैसे घरातील मोठ्यांकडे असलेले बरे…”
क्षणभर तिचं हृदय धडधडलं. पण यावेळी ती गप्प बसली नाही.
” तुम्हाला वाटतंय इतकी पण जास्त कमी नाहीये बाबा.
.बस माझा आणि मुलींचा जेमतेम खर्च निघतो एवढेच पैसे मिळतात…” तिने शांतपणे आणि ठाम आवाजात सांगितलं.
” तुझा आणि मुलींचा खर्च कोणता…सगळा खर्च तर मीच करतो ना घरात…तुम्हाला काय काम आहे पैशांच..?” सासरेबुवा रागात म्हणाले.
” मला माफ करा बाबा…पण मी तुम्हाला हे पैसे देऊ शकत नाही…” हे बोलताना मीनाक्षीचा आवाज आज पहिल्यांदाच एवढा ठाम होता.
त्यामुळेच सासरेबुवांनी मीनाक्षीला समज द्यायला म्हणून त्यांच्या दोन्ही मुलींना बोलावून घेतले होते. आणि म्हणूनच नणंदा आज तिला सगळे पैसे बाबांच्या हातात दे म्हणून समजावून सांगत होत्या.
रात्री ती खूप विचार करत बसली. आयुष्याने तिला फार कठीण वळणावर आणून उभं केलं होतं. पण यावेळी ती एकटी नव्हती. आणि ह्यावेळी प्रश्न तिच्या मुलींच्या गरजांचा होता. मुलींचा विचार करून तिच्यात एवढी हिंमत आली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती पुन्हा तिच्या खोलीतून बाहेर aali तेव्हा पुन्हा नणंदा तिच्या जवळ जात म्हणाल्या.
” वहिनी तू चुकीचं करतेस बघ…ज्यांनी तुझ्या कठीण काळात तुला सांभाळले…तुझ्या मुलींना कशाची कमी पडू दिली नाही…त्यांचा असा अपमान करायला नको होतास तू…” मोठी नणंद म्हणाली.
आता मात्र मीनाक्षी काही म्हणेल या आधीच कालपासून गप्प असलेली तिची सासू पुढे येत म्हणाली.
” तुझ्या मुलींना अस काय म्हणतेस…त्या तुझ्या भावाच्या पण मुली आहेत ना…हे घर त्यांच्या वडिलांचं आहे…तू अशी काळापासून तुझ्या मुली, तुझ्या मुली अस काय म्हणतेस तुझ्या वहिनीला…”
” अगं आई…या नव्हतं म्हणायचं मला…पण बघ ना वहिनी कशी वागते ते…”
” काही वागते म्हणजे काय…? एवढे वर्ष झाले ती या घरात लग्न करून यायला…आजवर कधी तक्रारीला जागा दिली का तिने कुणाला…कधी उलट बोलणे नाही, कधी कुठला हट्ट नाही…मनोज गेल्यावर सुद्धा हिमतीने उभी राहिली…त्याच्या विम्याचे पैसे तुझ्या बाबांकडे आणून दिले तिने…ती स्वतःकडे सुद्धा ठेवू शकली असतीच की…”
” मग विम्याचे पैसे बाबांकडे दिलेत तर आता पार्लर च्या कामातून आलेले पैसे बाबांकडे द्यायला काय होतंय तिला…” मोठी नणंद म्हणाली.
” कारण जेव्हा तिला कशासाठीही पैशांची गरज पडायची तेव्हा हे द्यायला आडमुठेपणा करायचे…बायकांना सुद्धा अनेक खर्च असतातच न…मुलींची शाळा महाग होते म्हणून शाळा बदलली ह्यांनी…माझ्या मुलानंतर माझ्या नातींची ही अवस्था मला सुद्धा पाहवत नव्हती…पण ह्यांनी माझं काहीच ऐकलं नाही…पण मागच्या महिन्यात त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं तेव्हा नको तिथे पैसे उधळला ह्यांनी…फक्त मोठेपणा दाखवण्यासाठी…पण ज्यांच्या हिस्स्याचा पैसा आहे त्यांना मात्र लहान सहान गोष्टीत सुद्धा मन मारून जगाव लागतंय…मनोजच्या नंतर आपणच आहोत ना मुलींना आणि मीनाक्षीला…तरीही तुम्ही असे वागताय तिच्याशी…” सासूबाई म्हणाल्या.
सासूबाईंचे बोलणे ऐकून सासऱ्यांना सुद्धा आता त्यांच्या चुकीची थोडी का होईना जाणीव झाली. त्यांनी मान खाली घातली आणि ते तिथून निघून गेले. नणंदा सुद्धा गप्प बसल्या. मीनाक्षी मात्र सासुबाईंची साथ मिळाल्याने आनंदून गेली होती.
पुढील काही दिवस घरात जरा तणाव होता. सासरे अबोला धरून होते. पण मीनाक्षीने आपलं काम थांबवलं नाही. सासूबाईंनी आता उघडपणे तिची साथ देण्याचं ठरवलं होतं. तिने पार्लरचा विस्तार केला. नवीन कोर्सेस शिकली, काही नवीन सेवा सुरू केल्या. हळूहळू तिचं उत्पन्न अजून वाढलं.
आता हळूहळू सासरेबुवांनी सुद्धा आपल्या चुका सुधारायला सुरुवात केली होती. त्यांनी पुन्हा मुलींची ॲडमिशन त्यांच्या जुन्या शाळेत करून दिली आणि त्यानंतर स्वतःच मुलींचा खर्च उचलायला सुरुवात केली. मुलींना चांगल्या ठिकाणी ट्युशन लावून दिली. काही दिवसांनी त्यांच्या विस्कटलेल्या आयुष्याची घडी पुन्हा पूर्ववत झाली.
समाप्त.
©® आरती निलेश खरबडकर.
अशीच एक प्रेरणादायी कथा वाचा 👇
https://mitawaa.com/प्रायश्चित्त/







