प्रियाची आज पहिली वटपौर्णिमा होती. प्रिया सुंदर हिरव्या रंगाची साडी घालून तयार झाली होती. लग्न झाल्यावर शांतनू ने मोठ्या हौसेने तिच्यासाठी ही हिरव्या रंगाची पिवळी किनार असलेली साडी आणली होती. गळ्यात ठुशी आणि मोठ मंगळसूत्र घातलं होतं. केसांचा अंबाडा आणि त्यावर सुंदर मोगऱ्याचा गजरा माळला होता. साधासा मेकअप केल्याने सुद्धा प्रियाचे सौंदर्य खुलून आले होते. एवढ्यात दारावरची बेल वाजली. आता यावेळेला कोण आले म्हणून प्रिया दार उघडायला गेली तर बाहेर शांतनू उभा होता. प्रियाला असं नटलेलं पाहून तो तिला पाहतच राहिला. त्याला पाहून प्रिया आश्चर्याने म्हणाली.
” तुम्ही आज इतका लवकर आलात ऑफिस मधून…?”
यावर ते काही उत्तर देणार त्या आधीच त्याची आई स्वयंपाकघरातून म्हणाली.
” राहवलं नसेल त्याला ऑफीस मध्ये…बायकोची पहिली वटपौर्णिमा आहे ना…”
” काय आई तू पण…” तो मिश्किल हसत त्याच्या खोलीत निघून गेला.
प्रिया पण त्याच्या मागे खोलीत आली आणि त्याला म्हणाली.
” तुम्ही खरंच माझ्यासाठी ऑफिसमधून लवकर घरी आलात…?”
तिला जवळ खेचत तो म्हणाला.
” हो…मला तुला असं नटलेलं पाहायचं होतं…मला राहवल्या गेलं नाही म्हणून हाफ डे घेऊन आलोय…”
” तुम्ही पण ना…आई काय विचार करत असतील…” प्रिया लाजत म्हणाली.
प्रिया आणि शांतनूचं लग्न झालं तेव्हा दोन्ही घरात आनंदाचं वातावरण होतं. प्रिया जशी समजूतदार आणि प्रेमळ होती, तसाच शांतनू शांत, जबाबदार आणि कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा मुलगा होता.
लग्नानंतरचे सहा महिने दोघांनी इतके सुंदर घालवले होते की त्यांना पाहून लोक म्हणायचे,
“देवाने अगदी जुळवून बनवलेली जोडी आहे ही!”
सकाळी प्रियाने केलेला गरम चहा घेत शांतनू तिच्याशी गप्पा मारत बसायचा. ऑफिसला जाताना तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन द्यायचा आणि प्रिया दिवसभर त्या आठवणीत हरवून जायची. सासू-सासरे, मोठा भाऊ – वहिनी, नणंद साक्षी… सगळं काही व्यवस्थित चाललं होतं.
पण आयुष्याला कदाचित इतकं सुख मान्य नव्हतं.
एक दिवस प्रिया माहेरी गेली असताना तिचा भाऊ शशांक अचानक म्हणाला,
“आई… मला साक्षी आवडते. तिचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं आहे.”
हे ऐकल्यावर घरात क्षणभर शांतता पसरली.
“काय?” प्रियाची आई आश्चर्याने म्हणाली.
” हो आई… तू बरोबर ऐकलं आहेस…” शशांक म्हणाला.
” अरे पण ती तुझ्या बहिणीची नणंद आहे…बहिणीच्या घरी सोयरिक करणे किती गुंतागुंतीचे राहील…एका नात्याचा परिणाम आपसूकच दुसऱ्या नात्यावर होईल…” आईने त्याला समजावत म्हटले.
” एवढ्या कारणासाठी मी माझं प्रेम विसरायला हवं का..?” शशांक म्हणाला.
प्रियालाही हे ऐकून धक्का बसला. साक्षी खूप हट्टी मुलगी होती. तिला सगळं काही तिच्या मनाप्रमाणे हवं असायचं. आणि शशांक सुद्धा अजून एवढा जबाबदार आणि समजदार नव्हता. दोघांचे एकमेकांशी पटणार नाही ह्याची प्रियाला खात्री होती पण शशांक ठाम होता. तो काही ऐकायलाच तयार नव्हता.
नंतर साक्षीनेही तिच्या घरात तेच सांगितलं. सुरुवातीला दोन्ही घरात थोडा विरोध झाला. “नाते अजून गुंतागुंतीचं होईल”, “उद्या काही बिनसलं तर?” अशा चर्चा सुरू झाल्या. पण साक्षी आणि शशांक दोघेही घरात लाडके होते. दोघेही हट्टाला पेटले होते. त्यांच्या प्रेमापुढे शेवटी घरच्यांनी हार मानली. शांतनू सुद्धा बहिणीच्या प्रेमाखातर ह्या लग्नाला तयार झाला होता.
आणि मोठ्या थाटामाटात शशांक आणि साक्षीचा साखरपुडा झाला. आपल्या भावाला आणि नणंदेला आनंदात पाहून प्रियाला सुद्धा वाटले की दोघे एकमेकांसोबत खूप आनंदी राहतील.
त्या दिवशी प्रिया खूप आनंदी होती. तिने साक्षीला मिठी मारत म्हटलं,
“आता तू फक्त माझी नणंद नाही, माझी वहिनी पण होणार!”
साक्षी हसली होती.
पण ते हसू फार काळ टिकलं नाही. नात्यांमध्ये पडलेली पहिली भेग
साखरपुड्यानंतर काही दिवसातच शशांक आणि साक्षीमध्ये सतत वाद व्हायला लागले. कधी फोनवरून भांडण, कधी भेटल्यावर टोमणे…
दोघांचाही अहंकार वाढत चालला होता.
एक दिवस तर फक्त शशांक भेटायला उशीरा आला या छोट्याशा कारणावरून मोठं भांडण झालं.
“मला तुझ्याशी लग्न करायचंच नाही!” साक्षी रागाने ओरडली.
“मलाही नाही!” शशांकनेही संतापाने उत्तर दिलं.
आणि एका क्षणात साखरपुडा मोडला. त्यानंतर दोघांच्याही घरच्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण दोघांनीही काहीच ऐकले नाही.
त्या घटनेनंतर दोन्ही घरात कटुता निर्माण झाली. प्रियाला तर सासरी वावरणे सुद्धा कठीण झाले. शांतनूची आई सतत प्रियाला म्हणायची,
“तुझ्या भावामुळे माझ्या मुलीचं आयुष्य खराब झालं!”
प्रिया शांतपणे सगळं ऐकून घ्यायची.
“आई, त्यात माझा काय दोष आहे?” ती हळू आवाजात विचारायची.
पण तिचं कोणी ऐकत नव्हतं.
साक्षीचा राग तर आणखी भयंकर होता. ती प्रत्येक गोष्टीत प्रियाला टोमणे मारू लागली.
“तुमच्या घरच्यांवर विश्वास ठेवायलाच नको होता!”
घरातलं वातावरण दिवसेंदिवस खराब होत गेलं. शांतनू बायको आणि घरच्यांच्या मध्ये अडकला होता. एका बाजूला बायको, दुसऱ्या बाजूला आई आणि बहीण. प्रिया रात्री उशिरापर्यंत रडत बसायची.
शांतनू तिच्या जवळ बसून तिला समजवायचा, पण तोही आतून तुटत चालला होता. एक दिवस प्रियाच्या सासूने मुद्दामहून प्रियाशी भांडण उकरून काढले. शांतनू समोर आसवे गाळली. खोटेनाटे सांगितले. प्रियाने सुद्धा यावेळी तिचा आवाज चढवला. आता मात्र शांतनूचा संयम सुटला. त्याने काहीही विचार न करता सर्वांच्या समोर प्रियाला एक कानाखाली मारली.
वाद इतका वाढला की दुखावलेली साक्षी रागाने घर सोडून माहेरी गेली. तिच्या माहेरच्यांनी तिचीच बाजू घेतली. घर सोडून निघून आलीस हे चांगलं झालं हे देखील तिला समजावले. तिचा भाऊ शशांक तिला म्हणाला की तो प्रत्येक परिस्थितीत तिच्या सोबत राहील. आईवडील सुद्धा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सुरुवातीला सगळ्यांनी तिला आधार दिला. सगळ्यांनी तिने शांतनू ला घटस्फोट द्यायला हवा असे सुचवले. तिच्या भावाने तर स्वतःहून पुढे जाऊन घटस्फोटाची प्रक्रिया सुद्धा सुरू केली. दोन घरातले अहंकार इतके वाढले की आता विषय “समेट” च्या पुढे गेला होता.
शांतनूच्या घरचे लोक सुद्धा हेच बोलू लागले की -“घटस्फोटच बरा.”
प्रियाला घटस्फोट नको होता. तिचे शांतनूवर अजूनही प्रेम होते. ती अनेकदा फोन हातात घ्यायची… शांतनूला कॉल करावा असं वाटायचं… पण पुन्हा स्वतःलाच थांबवायची.
“जर त्याला खरंच माझी गरज असती, तर तो आला असता आणि मला घेऊन गेला असता…” असे स्वतःला समजावायची.
तिकडे शांतनूवरही दबाव होता.
त्याची आई म्हणायची,
“ती मुलगी परत या घरात आली तर मी घर सोडून जाईन.”
साक्षी सुद्धा प्रियाला आणायचे म्हटल्यास जीव द्यायची धमकी द्यायची. बळेबळेच रडायची. मग शांतनू गप्प राहायचा.
शेवटी प्रियाच्या घरच्यांनी कोर्टात घटस्फोटाची केस दाखल केली.
आणि सगळ्यांना धक्का देत शांतनूनेही विरोध केला नाही.
त्या दिवशी कोर्टातून बाहेर पडताना प्रियाने एकदा मागे वळून त्याच्याकडे पाहिलं होतं. पण शांतनूने नजर चुकवली. त्या क्षणी प्रिया आतून पूर्ण कोसळली. तिला वाटले की आता ह्या नात्यात काहीच अपेक्षा शिल्लक नाहीत. घटस्फोट व्हायला अजून जरा वेळ होता.
काही महिने गेले. प्रियाच्या घरात पुन्हा शशांकसाठी मुली बघायला सुरुवात झाली. पाहुणे घरी यायचे. चहा-पाणी व्हायचं. पण त्यांच्या नजरा वारंवार प्रियाकडे वळायच्या.
“घरात घटस्फोटित मुलगी आहे?”
हा प्रश्न हवेतच तरंगत राहायचा. आणि मग अनेक स्थळं नकार देऊन जायची.
एक दिवस प्रियाने स्वतःच्या आईला मावशीशी बोलताना ऐकलं.
“प्रियामुळे शशांकचं लग्न जमत नाहीये…तिचा घटस्फोट झाला की एखादा विधुर नाहीतर घटस्फोटीत मुलगा पाहून लगेच तिचं लग्न लावायचं आहे. नाहीतर शशांकला मुलगी मिळणार नाही. ”
हे ऐकून प्रियाच्या हातातला कप थरथरला. तिला वास्तवाची जाणीव झाली. लग्न करून गेल्यावर माहेरी परतणारी मुलगी ही आईवडिलांसाठी ओझ असते हे तिला कळून चुकले. त्या रात्री ती खूप रडली. तिला पहिल्यांदाच जाणवलं की ती आता स्वतःच्या घरातही परकी झाली होती. हल्ली शशांक सुद्धा पूर्वीप्रमाणे तिच्याशी मोकळे बोलत नव्हता.
हल्ली कोर्टाच्या कामासाठी सुद्धा तिला एकटीला जावं लागायचं. तो काही न काही कारण सांगून सोबत येणं टाळायचा. त्याला सुद्धा आता हेच वाटत होते की प्रियामुळे त्याच्या लग्नात अडचण निर्माण होत आहे. एकंदरीत प्रिया आता माहेरी नकोशी झाली होती. आणि त्यांना काहीही करून लवकरात लवकर ह्या जबाबदारीपासून सुटका करून घ्यायची होती. म्हणूनच तिच्यासाठी नातेवाईकांना स्थळं पहायला सांगितली जात होती.
तिकडे शांतनूच्याही आयुष्यात काही चांगलं घडत नव्हतं. साक्षीने स्वतःसाठी स्वतःच दुसरं स्थळ पसंत केलं होतं. घरात तिच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. आई आणि बहीण स्वतःच्या आयुष्यात व्यस्त झाल्या. शांतनू मात्र पूर्ण एकटा पडला होता. रात्री घरी आल्यावर त्याला प्रियाची आठवण यायची. तिने लावलेली पडद्यांची घडी.तिच्या आवडीचा मोगऱ्याचा सुगंध. तिचं हसणं. तिच्याशिवाय सगळं घर रिकामं वाटायचं.
घरात साक्षीच्या लग्नाची तयारी सुरू होती. हल्ली तो जेवला की नाही, त्याला काही हवं का, त्याच्या घटस्फोटाची प्रक्रिया कशी सुरू आहे हे विचारायला सुद्धा त्याच्या घरच्यांना वेळ नव्हता. साक्षी तर फक्त स्वतःच्याच विचारात असायची. आईला सुद्धा शांतनू च्या मनाचा विचार करायला वेळ नव्हता. त्या क्षणी शांतनूला सगळं समजलं. खरंतर प्रियाचा काही दोष नव्हता. सगळे फक्त शशांकचा राग तिच्यावर काढत होते. आणि तो… तो स्वतःच्या बायकोसाठी उभाच राहिला नव्हता.
त्या जाणिवेने तो आतून हादरला. मनातून तो काहीतरी ठरवत होता. पण ते प्रत्यक्षात घडेल ह्या बाबतीत तो जरा साशंक होता.
घटस्फोटाच्या पुढच्या तारखेला प्रिया कोर्टात आली होती. साधा पांढरा ड्रेस, डोळ्यांखाली काळी वर्तुळं…ती खूप बदलली होती. शांतनू तिच्याकडे पाहतच राहिला. कार्यवाही सुरू व्हायला अजून वेळ होता.
तो हळूच तिच्याजवळ गेला.
“प्रिया…”
तिने वर पाहिलं.
कितीतरी दिवसांनी दोघे समोरासमोर उभे होते. काही क्षण शांतता होती.
मग शांतनूचा आवाज थरथरला.
“माझी खूप मोठी चूक झाली…”
हे ऐकून प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं.
“मी तुला एकटं सोडलं. सगळ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला… पण आज कळतंय, तूच माझं घर होतीस. तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे.”
प्रिया नुसतीच त्याच्याकडे बघत राहिली. ती काही बोलली नाही.
शांतनू पुढे म्हणाला,
“मला पुन्हा एक संधी देशील? मला तू परत हवी आहेस… कायमची.”
प्रियाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
यावेळी मात्र जराही वेळ न दवडता तिने त्याला मिठी मारली.
“मला कधीच तुमच्यापासून वेगळे व्हायचे नव्हते, शांतनू. माझ्या मनात आजही फक्त तुम्हीच आहात. तुमच्यापासून वेगळं झाल्यावर माझं अस्तित्व सुद्धा काही उरलं नसतं.”
त्या क्षणी दोघांच्याही मनावरचं ओझं हलकं झालं. दोघांनी कोर्टातच घटस्फोटाची केस मागे घेतली. घरच्यांनी त्यांच्या पुन्हा एकत्र येण्याला विरोध केला, त्याची आई म्हणाली की माझ्या मुलीला दुःख देणाऱ्याच्या बहिणीला मी या घरात पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही. पण यावेळी शांतनू ठाम उभा राहिला.
“माझ्या बायकोचा अपमान आता कोणी करणार नाही आणि तिला कोणीही काही बोललेल मी सहन करणार नाही.”
त्याने आपल्यासाठी उभं राहिलेलं बघून प्रिया त्याच्याकडे पाहत राहिली.
ज्याची ती इतके दिवस वाट पाहत होती… तो तिचा शांतनू अखेर परत आला होता.
दोघांनी स्वतःच वेगळं भाड्याचं घर घेतलं. छोटंसं घर… पण मनाने खूप मोठं. तिथे ते दोघे राजा राणीचा संसार करणार होते आणि त्यांच्यात गैरसमज निर्माण करणारं किंवा त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करणारं कुणीच नव्हतं.
एका संध्याकाळी गच्चीत उभं राहून प्रिया म्हणाली,
“आपण इतकं सगळं सहन केलं… तरी आपण पुन्हा एकत्र आलो.”
शांतनू तिचा हात हातात घेत म्हणाला,
“कारण काही नाती तुटण्यासाठी नसतात… ती कितीही दूर गेली तरी पुन्हा एकमेकांकडे परत येण्यासाठीच बनलेली असतात.”
आणि त्या क्षणी, मावळत्या सूर्याच्या साक्षीने, त्यांच्या आयुष्यातलं हरवलेलं प्रेम पुन्हा एकदा उमललं.
समाप्त.
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसह. धन्यवाद 😊
©® आरती निलेश खरबडकर.







