अजय आणि विजय—एकाच छपराखाली वाढलेले, एकाच चुलीतले दोन भाऊ. वडील लवकर गेले आणि आईनेच त्यांना मोठं केलं. वडिलांच्या आठवणी कमी, पण त्यांच्या शिकवणी खोलवर रुजलेल्या. “भावकीत पैशापेक्षा नातं मोठं,” हे वाक्य आई नेहमी म्हणायची. अजयच्या मनावर ते कोरलं गेलं होतं. विजय मात्र व्यवहाराकडे जास्त बघणारा होता. तो हुशार होता, पण हुशारीबरोबर थोडी चलाखीही आली होती.
अजय अभ्यासात चांगला. मेहनत, शिस्त, आणि संयम याच्या जोरावर त्याला सरकारी नोकरी मिळाली. गावात आईचं स्वप्न पूर्ण झालं, सगळ्यांनी कौतुक केलं. विजयने शेतीची वाट धरली. वडिलोपार्जित जमीन, काळी माती, पाण्याची सोय—सगळं अनुकूल होतं. सुरुवातीला दोघे एकमेकांना आधार देत होते. अजय शहरात तर विजय गावात राहत होता; पण दोन भावांतली नाळ अजूनही घट्ट होती.
वर्षे सरकली. अजयचं लग्न अपर्णाशी झालं. अपर्णा साधी, समजूतदार, कष्टाळू. संसार म्हणजे केवळ घर नव्हे, तर जबाबदारी आहे हे तिला ठाऊक होतं. विजयचंही लग्न झालं. त्याच्या घरात चैतन्य, थाट, खर्च—सगळं जास्त दिसायचं. पण तो अजयसमोर नेहमी तक्रार करायचा.
“शेतीत काहीच उरत नाही रे अजय,” विजय फोनवर म्हणायचा. “खर्च वाढलाय. खत महाग, मजूर महाग. पोरांची शाळा… काहीतरी मदत कर.”
अजय क्षणाचाही विचार न करता मदत करायचा. “भावासाठी नाही तर कोणासाठी?” असं तो स्वतःशी म्हणायचा.
अपर्णा हळूहळू सगळं पाहत होती. सुरुवातीला ती काहीच बोलली नाही. महिन्याच्या शेवटी घरखर्चाची वही मांडताना आकडे जुळेनात. तेव्हा ती अतिशय काटकसरीने घर चालवत असे. पण जसजसे वर्षे सरकत गेली तसतसे अजय आणि विजय दोघांनाही मुले झाली. त्यामुळे अर्थातच विजयची पैशांची मागणी वाढली आणि अजयच्या घरचे खर्च सुद्धा वाढले. आता मात्र घरात सतत पैशांची अडचण जाणवू लागली. त्यामुळे शेवटी अपर्णा अजयला म्हणालीच की,
“आपण थोडे कमी पैसे पाठवू शकत नाही का? आपल्या मुलांचाही खर्च वाढतोय आता.”
“दादा अडचणीत आहे अपर्णा. आपणच थोडा खर्च कमी करू अन् दादाला मदत करु.” अजय नरमाईने म्हणाला.
हे ऐकल्यावर अपर्णा गप्प बसली. कारण तिला माहीत होतं. अजय भावासमोर तिचे काहीच ऐकणार नाही. मुलं मोठी होत होती. शाळा बदलली. फी वाढली. क्लासेस, वह्या, बस. अपर्णा प्रत्येक गोष्टीत काटकसर करायची. तिचा स्वतःचा असा खर्च काहीच नव्हता. अशातच तिचा फोन देखील खराब झालेला. पण तो कसाबसा फोन चालवत होती.
” नवीन फोन घेतला नाही तरी चालेल…पण सध्या मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य द्यायला हवं.” असं ती स्वतःलाच समजावत असे.”
पण एक दिवस काहीतरी महत्वाच्या विषयावर शाळेतून फोन आला, जो तिला नीट ऐकू आला नाही. दुसऱ्या दिवशी शिक्षिकेनी जेव्हा तिला विचारलं, “हल्ली तुमच्या फोनचा आवाज का येत नाही ??…त्यामुळे महत्वाच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कळत नाहीयेत.”
अपर्णा त्यावर काहीच उत्तर देऊ शकली नाही. पण मनातून मात्र तिला खूप वाईट वाटलं होतं. अजय गप्प बसून ऐकत होता. त्याला मनातून अपराधी वाटत होतं, पण तो काही बोलू शकला नाही.
त्याच काळात विजय मात्र नव्या गाडीतून फिरत होता. बायकोसाठी महागडा फोन, घरात नवे फर्निचर, सणांना थाट. एकदा तर त्याने मेहुण्याच्या मुलीच्या लग्नात सोन्याची चेन दिली. ही बातमी गावातून अजयपर्यंत आली. हे ऐकून त्या दिवशी अजय पहिल्यांदा अस्वस्थ झाला. “जर शेतीत काहीच उरत नसेल, तर हे सगळं कसं शक्य आहे?” हा प्रश्न त्याच्या मनात घोळू लागला.
आणि मग तो प्रसंग आला ज्याने अजय पुरता कोलमडला.
त्याच्या लहान मुलीच्या ऍडमिशनसाठी पैसे कमी पडले होते. अजयने प्रयत्न केले, पण सध्या हातात काही उरलं नव्हतं. तेव्हा त्याने अपर्णा समोर मुलीला एका साध्या शाळेत ऍडमिशन घ्यायचा प्रस्ताव ठेवला. अपर्णा शांतपणे उठली, कपाट उघडलं, आणि तिचे सोन्याचे कानातले काढले.
“हे गहाण ठेवू,पण दोघे बहीण भाऊ एकत्रच शिकतील” ती म्हणाली.
हे पाहून अजय हादरला. “नको अपर्णा… काहीतरी बघू आपण…पैसे होतील ऍडजस्ट. मी करतो काहीतरी.”
ती थेट म्हणाली, “आता काही बघायला वेळ नाही. उद्या ऍडमिशन ची शेवटची तारीख आहे.”
शेवटी तिचे कानातले गहाण ठेवूनच पैशांची ती अडचण दूर झाली आणि मुलीचे ॲडमिशन झाले.
काही दिवसांनी बाजारात अजयची भेट त्याच्या गावातील एका शेतकऱ्याशी झाली.
“विजयचं पीक यंदा फारच भारी गेलंय,” तो सहज म्हणाला. “माल चांगल्या भावात गेला…मी तर ऐकलं की नवीन कार घ्यायचा विचार करतोय तो…”
हे ऐकून अजयच्या पायाखालची जमीन सरकली. तो घरी गेला तो अगदीच सुन्न डोक्याने. विजयजवळ शेतीचा चांगला पैसा उरत असल्यावर तो खर्चासाठी माझ्याकडून पैसे का घेतो हे त्याला कळत नव्हते. त्याने ठरवले की तो विजयशी ह्या बाबतीत बोलेन. इतक्यातच विजयचा फोन आला.
” मला जरा जास्त पैशांच काम आलं बघ अजय…तू बघ ना कर्ज वगैरे मिळत असेल तर…तू हळूहळू किस्त भरशीलच…पण माझी आताची गरज भागेल…” विजय पलीकडून म्हणाला.
” काय गरज आहे सध्या एवढी पैशांची…नवीन कार घेत आहेस का ??” अजयने सरळ विचारले.
अजयच्या प्रश्नाने विजय गोंधळला. अजयला हे सगळं कळेल असा त्याने विचार केला नव्हता.
” कार…नाही रे…आत्ता कुठे कार घ्यायचा विचार करणार मी ?”
” मग एवढे पैसे अचानकच कशाला हवेत ??”
” ते मी…शेतात काहीतरी गरज होती…” विजय अडखळत म्हणाला.
” मला कळलंय की आपल्या शेतात दरवर्षी चांगलं पिक होतं… तुला तसे पाहता पैशांची काहीच गरज नाही…तुझं बऱ्यापैकी चाललंय…पण या पैशांतून तू माझ्यासाठी कधीच काही केलं नाही…मला कधीच विचारले नाही की तुला काही हवं की नको…उलट पैशांची गरज नसतानाही माझ्याकडून पैसे घेत राहिलास…त्या पैशातून सुखवस्तू आयुष्य जगतोस…आणि मला फसवत राहिलास…मी कुठून कुठून पैशांची व्यवस्था करून तुला पैसे पुरवत राहिलो हे माझं मलाच माहित…एवढ्या वर्षात माझ्या बायकोला कधी कुठला दागिना घेऊन दिला नाही मी…उलट माझ्या मुलाच्या ॲडमिशन साठी तिला तिचे कानातले गहाण ठेवावे लागले…फक्त अन् फक्त तुझ्यासाठी मी माझ्या कुटुंबाची इतकी फरफट केली…आणि तू मात्र मला फसवत राहिलास…माझा सख्खा भाऊ असून तू माझ्याशी असं का वागलास ??”
आता मात्र विजयला कळत नव्हतं की अजयला काय उत्तर द्यावं. त्याच खोटं बोलणं उघडकीस आलं होतं. तरीपण स्वतःची चूक कबूल न करता तो अजयला म्हणाला.
” तू मला पैशांची मदत करत होता म्हणजे माझ्यावर काही उपकार नाहीस केले. घरच्यांनी तुझ्या शिक्षणावर खर्च केला म्हणूनच तुला नोकरी लागली ना. त्यामुळे आम्हाला पैशांची मदत करणे तुझे कर्तव्यच आहे.”
आता मात्र अजयला भावाचे बोलणे ऐकून धक्का बसला. विजय असा विचार करत असेल हे त्याच्या कधी ध्यानीमनी सुद्धा आले नव्हते. न राहवून अजय त्याला म्हणाला.
” आई बाबांनी तुझ्या शिक्षणावर खर्च नाही केला का ? आणि जेव्हा तुला खरंच गरज असेल तेव्हा तुला मदत करणे माझे कर्तव्य आहे. पण तुला गरज नसताना तू माझ्याशी खोटं बोलून, मला फसवून इतके वर्ष माझ्याकडून पैसे घेत राहिलास. आणि त्यामुळे माझ्या कुटुंबाला खूप तडजोड करून राहावे लागले. या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही.”
एवढे बोलून अजयने फोन ठेवला. अजय आतून पार तुटला होता. अशा वेळी अपर्णा ने त्याला सांभाळले, त्याला समजावले. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. विजयला मात्र आपल्या वागण्याचे काहीच गैर वाटत नव्हते. उलट त्याला अजयने यावेळेला पैसे द्यायला नकार दिला म्हणून राग आला होता.
त्यानंतर सहा महिने निघून गेले. विजयने स्वतःहून अजयला फोन केला नाही. अजय सुद्धा आता बऱ्यापैकी सावरला होता. पण विजयने केलेल्या फसवणुकीची जाणीव झाल्याने अजयच्या मनात विजय बद्दल कडवटपणा आला होता. या काळात अजयची आर्थिक घडी सुद्धा बऱ्यापैकी बसली होती. अशातच त्याचा पगार सुद्धा वाढला. त्यामुळे आताशा घरच्यांची सुद्धा हौसमौज करता येत होती. विजयला मात्र यावर्षी खरंच पिक चांगलं झालं नाही. जास्त पाऊस झाल्याने हाताशी आलेलं पीक वाया गेलं. बचतीची सवय नसल्यामुळे जवळ पैसे सुद्धा शिल्लक नव्हता. त्यामुळे कुणाची मदत घेण्यावाचून काही पर्याय सुद्धा शिल्लक नव्हता. अजयशी तो बोलत नव्हता त्यामुळे आजवर त्याने ज्या नातेवाईकांची मदत केली होती, ज्या नातेवाइकांवर पैसे खर्च केले होते त्यांना मदत मागितली. पण सर्वांनी काही न काही कारण सांगून विजयची मदत करायला नकार दिला. शेवटी काही पर्याय नाही म्हणून त्याने अजयला फोन केला. पण यावेळी अजयने सुद्धा स्पष्ट शब्दात विजयची मदत करायला नकार दिला. शेवटी विजयने आपली पैशांची गरज बायकोचा दागिना गहाण ठेवून पूर्ण केली. पण आता मात्र विजयला कळून चुकले होते की त्याने काय गमावले. एक पाठीराखा भाऊ ज्याने सतत आपली मदत केली त्याचा आपण गैरफायदा घेतला. स्वतःच्या आयुष्यात तडजोड करून जो भाऊ आपल्याला सुखसुविधा देत राहिला त्याला आपण गृहीत धरले ही जाणीव आता विजयला प्रकर्षाने झाली. आपलं कोण आणि परके कोण हे त्याला कळले पण ह्या गोष्टीला आता खूप उशीर झाला होता. अजय त्याच्यापासून दुरावला होता.
कधीकधी आपण स्वतः अडचणीत असून सुद्धा इतरांना कर्तव्य भावनेतून मदत करतो. पण समोरच्याला त्या मदतीची खरंच एवढी गरज आहे का हे बघणं सुद्धा गरजेचं आहे.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.




