विश्वासरावांना दोन मुली. गायत्री आजी कल्याणी. गायत्री त्यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे तर कल्याणी त्यांची स्वतःची मुलगी आहे. गायत्री त्यांच्या एका मित्राची मुलगी होती. तिच्या आईवडिलांच्या अपघाती जाण्याने गायत्री पोरकी झाली होती. तेव्हा विश्वासरावांनी स्वतःहून गायत्रीची जबाबदारी स्वीकारली आणि तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे लग्नाचे मोठे केले. कल्याणी सुद्धा गायत्री लहान बहिण मानायची. पण विश्वासरावांची बायको विनिताताई मात्र गायत्री फार पसंत करत नव्हती. त्यांना वाटायचे की गायत्री मुळे कल्याणीच्या हक्कावर गदा येत आहे. तिच्या मुळे कल्याणीच्या हक्कावर गदा येत आहे. पण विश्वासरावांच्या पुढे त्या काही बोलू शकत नव्हत्या.
विश्वासरावांनी दोन्ही मुलींना सारखंच शिक्षण दिलं, सारखंच प्रेम दिलं. पण विनिताताईंच्या मनातला काटा मात्र दिवसेंदिवस खोल जात होता. त्यांना वाटायचं. “ही परकी मुलगी आमच्या घरावर राज्य करेल एक दिवस…”
काळ पुढे सरकत गेला. दोन्ही मुली मोठ्या झाल्या. गायत्री अभ्यासात हुशार, शांत आणि समंजस होती. कल्याणी थोडी हट्टी, पण मनाने चांगली. विश्वासरावांनी दोघींसाठी समान रक्कम बँकेत ठेवली होती. पण हे कुणालाच माहित नव्हतं, अगदी विनिताताईंनाही नाही.
सगळं काही सुरळीत असताना एक दिवस विश्वासरावांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते गेले. घरात शोककळा पसरली. विनिता ताई आणि कल्याणी व गायत्री तिघीही जणू पोरक्या झाल्या. विश्वासरावांचे दिवसकार्य संपले आणि घरी आलेले नातेवाईक पण हळूहळू निघून गेले. या तिघींचेही आयुष्य हळूहळू पूर्ववत होत होते पण आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती.
वडिलांच्या मृत्यूनंतर एक वर्षाच्या आत मुलांचे लग्न करतात नाहीतर पुढचे तीन वर्ष लाग करता येत नाही हा त्यांच्या घराण्यात नियम होता. काही नातेवाईकांनी म्हणूनच कल्याणी साठी काही स्थळे सुचवायला सुरुवात केली. त्यातील एक स्थळ विनिता ताईंना चांगले वाटले. मुलगा चांगल्या घरातील होता. चांगला व्यवसाय होता आणि शिक्षण सुद्धा परदेशात झाले होते.
मग मुलीला पाहण्याचा कार्यक्रम साधेपणाने पार पडला आणि मुलाकडच्यांना सुद्धा कल्याणी आवडली. लवकरच एक चांगला मुहूर्त पाहून कल्याणीचे थाटामाटात लग्न लागून देण्यात आले. विनिताताईंना आपण एक मोठी जबाबदारी पार पाडल्याचे समाधान वाटले. कल्याणीच्या नवऱ्याला लग्नानंतर व्यवसायाच्या कामानिमित्ताने परदेशात जायचं होतं. त्यामुळे ते आपल्या सोबत तिला सुद्धा घेऊन गेला.
इकडे कल्याणीच्या लग्नानंतर आता नातेवाईकांमध्ये गायत्रीच्या लग्नाची बोलणी देखील व्हायला लागली. कल्याणी साठी चांगली स्थळं येत होती पण विनिता ताईंना गायत्रीसाठी कल्याणीच्या तोलामोलाच स्थळ नको होतं. त्यांना वाटत होते की आयुष्यभर कल्याणीच्या वाट्याचे प्रेम हिला मिळत राहिले. निदान आता तरी माझ्या कल्याणीची बरोबरी करायला नको हिने.
कल्याणीवर त्यांना आधीपासूनच असलेला राग आता आणखीनच बाहेर येत होता. आणि त्यांना आता लहानपणीपासूनचा हिशोब पूर्ण करायची संधी मिळत होती म्हणून त्यांनी शेजारचा गावातील एका साधारण शेतकऱ्याच्या मुलाशी सुनीलशी कल्याणीचे लग्न ठरवले. विनिताताईंवर गायत्रीचे खूप प्रेम होते. ती त्यांच्यातच तिच्या आईला पहायची. त्यांनी कितीही राग केला तरी गायत्रीने कधीच वाईट वाटून घेतले नव्हते. त्यामुळे आईचा निर्णय गायत्रीने मनापासून मान्य केला.
इतक्या श्रीमंत घरातील मुलगी आपल्या साधारण घरात का देत आहेत या बाबतीत सुनीलच्या घरचे संभ्रमात होते. अशातच सुनीलची आत्या त्याला म्हणाली की नक्कीच मुलीमध्ये काहीतरी खोट असेल म्हणूनच तर असं घाईघाईने लग्न करतायत. पण गायत्री चांगली शिकलेली आणि दिसायला सुंदर असल्याने सुनीलच्या घरच्यांनी आत्याचे बोलणे काही मनावर घेतले नाही. काही दिवसात साधेपणाने साखरपुडा पार पडला आणि त्यानंतर महिन्याभराने लग्नाचा मुहूर्त ठरला. कल्याणी नुकतीच परदेशात गेल्याने ती लग्नाला येऊ शकणार नव्हती. आज गायत्रीला कल्याणी येणार नसल्याचे खूप वाईट वाटत होते. पण नाईलाज होता.
गायत्रीच्या लग्नाचे दिवस जवळ आले होते आणि तयारी सुद्धा जवळपास पूर्ण झाली होती. गायत्रीच्या होणाऱ्या सासरी सुद्धा लग्नाची लगबग सुरू होती. अशातच ऐन हळदीच्या दिवशी सकाळी नवरा मुलगा सुनीलचा किरकोळ अपघात झाला. त्याला फारसं काही लागलं नाही पण त्याच्या घरच्या पाहुण्या मंडळींनी मात्र नवरी पांढऱ्या पायाची आहे. तिच्यामुळे सुनीलच्या जीवाला धोका आहे असा धोशा लावला. आता मात्र सुनील आणि त्याच्या घरच्यांना सुद्धा असेच वाटू लागले. त्यामुळे त्यांनी नवरीच्या घरी निरोप पाठवला की आता हे लग्न होऊ शकत नाही.
इकडे कल्याणीच्या हळदीची सगळी तयारी झाली होती. ऐन वेळेवर लग्न तुटल्याचा निरोप आल्याने विनिता ताईंचा पार हिरमोड झाला होता. कल्याणीला तर कळत नव्हते की नेमके काय घडले आहे ते. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. अशातच विनिता ताईंनी ह्या सगळ्याचा राग कल्याणीवरच काढला. त्या तिला म्हणाल्या की…
” तू पांढऱ्या पायाची मुलगी आहेस…लहानपणी आपल्या आई वडिलांना गिळले…मग माझ्या मुलीच्या वाट्याचं प्रेम वाटून घेतलंस…माझ्या नवऱ्याने आयुष्यभर तुझ्या सुखासाठी स्वतःच्या मुलीकडे दुर्लक्ष केलं… इतकं करूनही तुझ्याच पायगुणाने माझा नवरा सुद्धा गमावला मी…आणि आता लग्न मोडल्याने गावात आणि नातेवाईकांमध्ये बदनामी झाली ती वेगळीच…तू आमच्या आयुष्यातून निघून का जात नाहीस एकदाची…”
त्या शब्दांनी गायत्री पुरती खचली. तिच्यावर सख्ख्या मुलीप्रमाणे प्रेम करणारे विश्वासराव आज या जगात नव्हते. जिच्यावर बहिणीपेक्षा जास्त प्रेम केले ती कल्याणी सुद्धा आज तिच्यापासून दूर होती. विनीताताईंना तिने आपल्या आईचा दर्जा दिला होता पण त्यांनी सुद्धा तिचा राग राग केला. ती आता पूर्णपणे हताश झाली होती. ती तिच्या खोलीत जाऊन एकटीच रडत बसली होती. अशातच तिचे लक्ष तिच्या फोनवर आलेल्या एका नोटीफिकेशन कडे गेले. तिने जवळपास दोन महिन्यापूर्वी एका जॉबसाठी ऑनलाईन इंटरव्ह्यू दिला होता. त्यात ती सिलेक्ट होऊन त्या अपॉईंटमेंट लेटर आले होते. ते पाहताच तिच्या डोक्यात विनिता ताईंचे शब्द घुमू लागले की तू आमच्या आयुष्यातून निघून का जात नाहीस.
मग गायत्रीने निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी आपली बॅग पॅक करून ती विनिता ताईंसमोर उभी राहिली. तिला पाहून त्यांनी न पाहिल्यासारखे केले आणि दुसरीकडे बघू लागल्या. मग गायत्री स्वतःहून त्यांना म्हणाली.
” आई, मी जात आहे…”
” जा…आणि शक्य झाल्यास परत नको येऊस…” विनिता ताई रागाने म्हणाल्या.
त्यांच्या बोलण्याने दुखावलेली गायत्री तशीच डोळ्यांत पाणी घेऊन घराचा उंबरठा ओलांडून निघून गेली. तिचे लग्न मोडल्याचे कल्याणीला समजले तेव्हा तिने फोनवरून गायत्रीला आधार दिला. पण गायत्री ने विनिता ताईंच्या बोलण्याबद्दल तिला काहीच सांगितले नाही. गायत्री सगळ काही विसरून नोकरीसाठी घराबाहेर पडते आहे म्हटल्यावर कल्याणी निश्चिंत झाली.
पुढे विनिता ताई घरी एकट्याच राहू लागल्या. सोबतीला मदतनीस म्हणून गावातीलच रखमाबाई यायच्या. विश्वासराव लोकांना व्याजाने पैसे देत असत. पण ते गेल्यावर बऱ्याच लोकांनी त्यांचे पैसे बुडवले. त्यांच्याकडे असलेली शेती नोकर माणसांवर अवलंबून असल्याने तिच्यात सुद्धा लोकांनी विनिता ताईंना फसवलेच. लक्ष द्यायला कोणीच नव्हतं.
काही महिन्यांनी अचानक घरावर कर्जाचं नोटीस आलं. विश्वासरावांनी कुणाला व्याजाने पैसे द्यायला म्हणून घर गहाण ठेवून मोठं कर्ज घेतलं होतं. व्याजाचे पैसे चांगले येतील आणि आपण बँकेचं कर्ज फेडू या हिशोबाने त्यांनी हा व्यवहार केला होता. पण अशाच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आणि ज्याला ती रक्कम दिली होती तो व्यक्ती सुद्धा गायब झाला. विनीता ताई आणि दोन्ही मुलींना ह्याबाबतीत काहीच कल्पना नव्हती. आता अचानक ही नोटीस आल्यावर त्या एकदम घाबरल्याच. व्यवसायात आधीच नुकसान झालं होतं. आणि आता तर घर जप्त होण्याची वेळ आली.
विनिताताई हादरल्या. त्यांनी कल्याणीला फोनवरून हा सगळ्याची कल्पना दिली. कल्याणी ने आईला धीर दिला पण पैशांची मदत मात्र ती करू शकत नव्हती. विनिताताई अशाच चिंताग्रस्त होऊन बसलेल्या असताना अचानक दारात एक गाडी थांबली. आणि त्यातून गायत्री उतरली. गायत्री आता एका मोठ्या कंपनीची अधिकारी होती. ती आल्यावर विनिता ताईंच्या पाया पडली आणि म्हणाली.
“बाबांनी घेतलेलं कर्ज मी फेडलं आहे. आता ही घर पुन्हा आपलं आहे.”
विनिताताई अवाक् झाल्या. जिचा त्यांनी संपूर्ण आयुष्यभर राग राग केला तिने आज त्यांचं घर वाचवलं होतं. त्या क्षणी त्यांना वाटून गेलं की गायत्रीला समजून घेण्यात त्यांनी चूक केली आहे. त्यांच्याशी बोलून गायत्री परत जायला वळली, तेव्हा विनिताताईंनी तिचा हात धरला.
त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
” मला माफ कर पोरी… मला सतत वाटायचं की तू आमचं काहीतरी हिरावून घेशील. पण तू तर सगळं वाचवलंस.”
इतक्या वर्षानंतर त्यांच्या आपुलकीने गायत्री गहिवरून गेली. तिने रोखण्याचा प्रयत्न केला तरी डोळ्यात पाणी आलंच. ती विनिताताईंना म्हणाली.
” आई, तुम्ही मला मुलगी मानलं नसेल… पण मी तुम्हाला नेहमीच आई मानलं. तुम्ही माझी माफी मागू नका. तुमच्या बाजूने विचार केला तर मला वाटतं की तुमची काही चूक नव्हती.”
यानंतर विनिता ताईंनी आज पहिल्यांदा गायत्रीच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला. आज पहिल्यांदाच दोघींमध्ये मायलेकींच नातं बहरून आलं होतं. इतक्यात दारावर आणखी एक गाडी येऊन थांबली. ह्या दोघींनी बघितलं तर समोरून कल्याणी येत होत होती. दोघींनाही आनंद झाला. ह्या दोघींना एकत्र आलेलं बघून कल्याणी सुद्धा खूप आनंदून गेली होती. एवढ्या वर्षांची सल निघून गेली होती. हा क्षण विश्वासरावांनी पहिला असता तर ते सुद्धा खूप खुश झाले असते असे तिला वाटून गेले. कल्याणी आणि गायत्री तीन चार दिवस तिथेच थांबणार होत्या. त्या थांबून विश्वासरावांच्या सगळ्या कागदपत्रांची नीट तपासणी करून सांभाळून ठेवणार होत्या. त्यांच्या व्यवहारांची माहिती करून घेणार होत्या.
असेच कागदपत्र तपासताना कल्याणीच्या हाती विश्वासरावांची एक डायरी लागली. त्या डायरीतील मजकूर वाचून कल्याणीला धक्का बसला. ती लगेच विनिता ताई आणि कल्याणीकडे आली.
आणि त्यांना डायरी तील मजकूर दाखवला. डायरीत लिहिलेले होते की
“गायत्री माझी मुलगी नसली तरी मला माझ्या मुली प्रमाणेच प्रिय आहे. ती माझ्या मित्राची मुलगी आहे हे खरं. पण तिच्या आईवडिलांच्या मृत्यूस मी कारणीभूत आहे. त्या अपघाताच्या दिवशी गाडी मी चालवत होतो… चूक माझी होती. मला ही सल आयुष्यभर बोचत राहिली. पण मी गायत्रीला कोणतीही अपराध बोधातून दत्तक घेतलं नाही. मी मनापासून तुला मुलगी मानलं होतं म्हणून मी तिला दत्तक घेतलं आणि स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवलं..”
हे वाचून घरात शांतता पसरली.
गायत्रीच्या पायाखालची जमीन सरकली. पण थोड्या वेळात ती स्वतःला सावरत म्हणाली.
” बाबांनी जाणूनबुजून काहीच केलं नव्हतं. तो एक अपघात होता आणि त्या अपघातात प्रायश्चित्त सुद्धा बाबांनी आयुष्यभर भोगलं आहे. अपघातात ते वाचले ही काही त्यांची चूक नाही. ते त्यांचं नशीब असेल. त्यामुळे माझ्या मनात बाबांबद्दल काहीच राग नाही. उलट मी त्यांची मुलगी आहे ह्याचा मला अभिमानच आहे.”
हे ऐकून विनिता ताईंच्या डोळ्यात पाणी आले. गायत्रीला चांगुलपणा आणि आपण एवढ्या वर्षात तिचा केलेला दुस्वास आठवून त्यांना अपराधीपणाची भावना दाटून आली. त्यांनी मनोमन ठरवले की आजवर ज्या आईच्या प्रेमापासून गायत्री पोरकी होती तिला ते प्रेम द्यायचे म्हणून. कल्याणी ने सुद्धा गायत्रीला मिठी मारली. विनिता ताईंनी दोघींना पण आपल्या कुशीत घेतले. आणि त्याचं घर प्रेम iआणि वात्सल्याने भरून गेलं.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.




