मेघनाने हळू आवाजात विचारलं,
“तू… काय म्हणालास?”
मिलिंद शांतपणे म्हणाला,
“मी खरं बोलतोय. जर तुला मान्य असेल… तर आपण लग्न करू शकतो.”
मेघनाच्या आईच्या डोळ्यांत पाणी आलं.
“बाळा… तू आम्हाला कोणत्या संकटात वाचवत आहेस ह्याची तुला कल्पना नाही..” त्या म्हणाल्या.
मेघना अजूनही विचारात होती.
“पण… तुझं लग्न झालं होतं ना?”
मिलिंद थोडा वेळ शांत राहिला.
मग म्हणाला,
“हो. पण आम्ही लवकरच घटस्फोट घेत आहोत. पुढच्या पाच सहा दिवसांत आमचा घटस्फोट सुद्धा होईल.”
त्याने अधिक काही सांगितलं नाही.
मेघनाने त्याच्याकडे बराच वेळ पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर अजूनही दुःख होतं, पण त्या दुःखात आशेची एक छोटीशी किरण दिसत होती. तिच्या आई वडिलांची होणारी मानहानी, नातेवाईकांची कुजबुज ह्या सगळ्यातून यामुळे सुटका मिळणार होती.
” याक्षणी मी नाही म्हणण्याच्या परिस्थितीत अजिबात नाही. जर तुला तुझ्या निर्णयाची खात्री वाटत असेल…तर मला हे लग्न करायला काहीच हरकत नाही,” ती म्हणाली.
मिलिंदने मान हलवली.
त्या क्षणी एक नवीन निर्णय घेतला गेला होता — जो अनेक आयुष्यं बदलणार होता.
मेघनाच्या घरच्यांनी लगेच तयारी सुरू केली. त्यांचं म्हणणं होतं,
“ज्या दिवशी आधीचं लग्न होणार होतं, त्याच दिवशी मिलिंद आणि मेघनाचं लग्न होईल.” तो दिवस होता — फक्त आठ दिवसांवर. पण योगायोगाने त्या दिवशी अजून एक गोष्ट होणार होती. तोच दिवस होता मिलिंद आणि मनिषाच्या घटस्फोटाचा.
दुसऱ्या दिवशी मिलिंद मनिषाला भेटायला गेला. ती हॉस्टेलच्या गार्डनमध्ये बसली होती. तिच्या हातात ती डायरी होती जी मिलिंदने तिला दिली होती. तो तिच्या जवळ बसला.
“काय लिहितेस?” त्याने विचारलं.
“काही नाही… फक्त विचार लिहिते आहे त्यावर.” ती हसत म्हणाली..
काही क्षण शांतता होती.
मग मिलिंद म्हणाला,
“मनिषा… मला तुला काही सांगायचं आहे.”
ती त्याच्याकडे वळली.
“काय?”
“मी लग्न करायचं ठरवलं आहे.”मिलिंदने हळू आवाजात सांगितलं,
मनिषा काही क्षण काही बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावरचं हसू जणू गोठलं.
“कोणाशी?” तिने हळू आवाजात विचारलं.
“माझ्या ऑफिसमधल्या मेघनाशी.”
त्या क्षणी मनिषाच्या मनात काहीतरी तुटलं. पण तिने ते लपवण्याचा प्रयत्न केला. ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली,
“खूप छान… अभिनंदन.”
मिलिंद म्हणाला,
“लग्नाचा दिवस… आपल्या घटस्फोटाचा दिवस असेल.”
तिच्या हातातली डायरी हलकीशी थरथरली. पण तिने तेही लपवलं.
“अरे वा..अभिनंदन!” ती म्हणाली.
मिलिंद काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याला वाटलं ती खुश आहे.
पण त्याला तिच्या डोळ्यांतील हलकी वेदना दिसली नाही. त्या रात्री मनिषाला झोपच लागली नाही. ती खिडकीजवळ बसली होती.
तिच्या डोक्यात सतत एकच विचार चालू होता.
तिला समजत नव्हतं की तिला एवढं वाईट का वाटत होतं. तिने स्वतःलाच विचारलं, “मला काय फरक पडतो?”
तिचं प्रेम अनिकेतवर होतं. ती लवकरच त्याच्याशी लग्न करणार होती. मग तरीही…मिलिंद दुसऱ्या कुणाचा होणार आहे ही कल्पना तिच्या मनाला का टोचत होती?
दुसऱ्या दिवशी तिने अनिकेतला भेटायला बोलावलं. तो कॅफेमध्ये आला.
पण त्याचा मूड वेगळाच दिसत होता.
“काय झालं?” मनिषाने विचारलं.
अनिकेतने थेट प्रश्न विचारला,
“तुझ्या पहिल्या लग्नातले दागिने कुठे आहेत?”
ती थोडी चकित झाली.
“का?”
” मला पैशाचं काम आहे. तुझे दागिने गहाण ठेवले तर माझी अडचण दूर होईल. फक्त ते दागिने कुठे आहे ते सांग.”
ती सहज म्हणाली,
“मी हॉस्टेलला येण्यापूर्वी ते सगळे दागिने माहेरच्यांना परत पाठवून दिले.”
हे ऐकून अनिकेतचा चेहरा बदलला.
“काय?” ते ओरडत म्हणाला.
“हो… मला वाटलं की त्यांचे दागिने त्यांना परत करावेत. कारण त्यावर आता माझा काहीच हक्क नाही.” मनिषा म्हणाली.
अनिकेत काही क्षण शांत राहिला.
“म्हणजे लग्नानंतर तू काहीच घेऊन येणार नाहीस?” तो चिडून म्हणाला,
मनिषा थक्क झाली.
“अनिकेत… तू काय बोलतोयस?”
“मी तुला कसं सांभाळणार? लग्नानंतर किती खर्च असतात तुला माहिती आहे का..?” “तो रागाने म्हणाला,
तिच्या डोळ्यांत पाणी आलं.
“तुझं माझ्यावर प्रेम आहे ना?” तिने विचारले.
अनिकेतने तिच्याकडे पाहिलं.
आणि शांतपणे म्हणाला,
“मनिषा… मला वाटतं आपण लग्न करू नये.”
त्या शब्दांनी तिला प्रचंड मोठा धक्का बसला.
“का?” ती डोळ्यांत आलेले अश्रू पुसत म्हणाली.
“कारण मला आत्ताच इतक्या जबाबदाऱ्या घ्यायच्या नाहीत.”अनिकेत म्हणाला.
” तू असे काय करतोस अनिकेत. तुझ्यासाठी मी सगळ्या जगाला सोडून आली आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे ना…” ती डोळ्यांत पाणी आणून म्हणाली.
” प्रेम…कसलं प्रेम…अगं ते कॉलेजपुरतं होतं फक्त…पण तू सुंदर होतीस, घरची एकुलती एक लेक होतीस…मला वाटलं की तुझ्याशी लग्न केल्यावर मलाही काहीतरी मिळेल…माझं पुढच आयुष्य ऐशी आरामात जाईल…म्हणून तुला लग्नाचं आश्वासन दिलं होतं मी…पण तुझ्या घरच्यांनी आपल्या प्रेमाला विरोध केला आणि तुला घरात कोंडून ठेवलं तेव्हाच मी तुझा विषय सोडून दिला होता…त्यानंतर मी तुला संपर्क करण्याचा एकही प्रयत्न नाही केला…पण तू वेडी समजली नाहीस…
आणि एवढं प्रेमाबद्दल बोलत आहेस तू…इतके वर्ष तुझ्यावर तुझा आई वडिलांनी एवढं प्रेम केलं त्यांची सुद्धा नाही झालीस तू…लग्नात एवढे सात वचन दिलेस नवऱ्याला तरीसुद्धा त्याच्या आयुष्याशी खेळलीस तू…तर माझी काय होशील…त्यामुळे माझं ऐक आणि मला विसरून जा…आणि माझी काळजी करू नकोस…मी आरामात जगेन तुझ्या शिवाय… तसंही मला एक घटस्फोटीत मुलीशी लग्न करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही…मी विचार केला होता की तुझ्या माहेराहून तुला मिळालेले दागिने वापरेन…पण तू ते सुद्धा परत देऊन टाकलेस…निर्बुद्ध मुली…”
एवढे बोलून तो निघून गेला. तिला तर काय बोलावं आणि काय करावं ते कळतच नव्हतं. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. आणि त्या क्षणी तिला सगळं समजलं. अनिकेतचं प्रेम…खरं प्रेम नव्हतं. तो तिच्या दागिन्यांवर डोळा ठेवून होता. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिला कळले की ती आज पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. ती काहीही न बोलता तिथून उठली.
त्या रात्री मनिषा खूप रडली. तिने डायरी उघडली.
आणि लिहिलं — “आज मला समजलं… मी किती मोठी चूक केली ते.”
तिला आठवत होतं. मिलिंदचा शांत स्वभाव. त्याची काळजी. त्याचं हसू. त्याचा आदर. तो माणूस तिला खरंच जपायला तयार होता. आणि तिने त्याला दूर ढकललं होतं. त्या क्षणी तिच्या मनात एक भयानक सत्य उमटलं. ती मिलिंदच्या प्रेमात पडली होती. पण आता…कदाचित खूप उशीर झाला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली. तिने आरशात स्वतःकडे पाहिलं.
तिच्या डोळ्यांत अजूनही अश्रू होते. पण त्या डोळ्यांत आता एक निर्णयही होता.
“मी मिलिंदची माफी मागेन.”
“मी त्याला सांगणार की मला घटस्फोट नको.”
“मी त्याच्या प्रेमात पडले आहे.”
तिने ठरवलं की ती त्याच्या लग्नात जाईल. आणि सगळं सांगेल. कदाचित अजून वेळ गेलेली नसेल. कदाचित तो अजूनही तिची वाट पाहत असेल.
क्रमशः





