तो घरी आला आणि तडक आपल्या रूम मध्ये गेला. मनिषा सुद्धा रात्रभर झोपली नव्हती. आता काय होईल ह्याची तिला भीती वाटत होती. तो आल्यावर तिने घाबरलेल्या अवस्थेत त्याला बघितले. तिला पाहताच तो म्हणाला.
” पुढे काय करायचे ठरवले आहेस..?”
” मी..मी..काहीच ठरवले नाही अजून…” ती घाबरतच म्हणाली.
” पण काही न काही तरी निर्णय घ्यावा लागेल ना तुला…” तो म्हणाला.
” मला काही कळत नाही आहे…” ती म्हणाली.
” तू त्याला पूर्णपणे विसरून माझ्यासोबत संसार करायला तयार आहेस का…?” त्याने विचारले.
यावर ती काहीच बोलली नाही. पण तिच्या गप्प राहण्यातून सुद्धा तिचं उत्तर याला कळलं होतं.
” मला तुझं उत्तर मिळालं आहे…आता फक्त एवढ सांग की तू ज्या मुलावर प्रेम करतेस तो तुला स्वीकारेल का…?”
” हो…तो तर माझ्या शिवाय अजिबात जगू शकत नाही…तो स्वीकारेल मला…” मनिषा म्हणाली.
तिचे उत्तर ऐकून ह्याच्या मनात कालवाकालव झाली. पण ह्याने चेहऱ्यावर तसे काहीच दाखवले नाही.
सकाळी त्याने मामा-मामींना सगळं सांगितलं. मामाला खूप मोठा धक्का बसला. मामी तर खूप संतापल्या आणि म्हणाल्या.
“अशी मुलगी घरात ठेवायची नाही. आताच्या आता तिला घराबाहेर काढ. आम्हाला फसवलं हिने आणि हिच्या घरच्यांनी…”
“तिला लगेच माहेरी पाठव.” मामा म्हणाले,
पण मिलिंद शांत होता. काही वेळाने तो म्हणाला,
“तिला तिचं प्रेम मिळायला हवं. आपण तिच्या घरच्यांशी याबाबत बोलून बघू. ”
“तुला काही समजतं की नाही ? हिने तुला फसवलंय. आपल्या सगळ्यांना फसवलंय हिने. हिला फक्त अन् फक्त शिक्षाच मिळायला हवी. आणि तू हिला प्रेम मिळवून द्यायला निघालाय. दुसऱ्यांना फसवणाऱ्यांच्या नशिबात प्रेम लिहिलेलं नसतंच मुळी. न माझ्या अनिकेत सारख्या चांगल्या मुलाच्या आयुष्याशी खेळलीस हे पाप कुठे फेडणार आहेस…” मामा ओरडले,
“जबरदस्तीच्या नात्यात कुणालाही ठेवायचं नाही मामा. जे घडलं ते खूप वाईट होतं. म्हणून पुढे सुद्धा वाईट घडायलाच हवं का. मला माझं प्रेम नाही मिळालं म्हणून तिलाही मिळायला नको असे काही नाही..” मिलिंद शांतपणे म्हणाला.
आता मिलिंदला काय म्हणावं हा प्रश्न मामा मामीला पडला. त्यांना मिलिंदचा निर्णय अजिबात आवडला नव्हता. पण आधीच दुखावलेली मिलिंदला त्यांना आणखी दुखवायचे नव्हते. म्हणून त्यांनी मनिषाच्या घरच्यांना बोलावून घेतले. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. त्यावर मनीषाचे वडील मिलिंद वरच चिडत म्हणाले.
” आम्ही आमच्या मुलीचे लग्न तुमच्याशी लावून दिले आहे. आता तिची जबाबदारी तुमच्यावर आहे. ती मेली तरी चालेल पण आम्ही तिला परत आमच्या घरात घेणार नाही. तुम्हाला तिच्या सोबत काय करायचे ते करा पण आम्ही तिला पुन्हा कधीही आमच्या दारात घेणार नाही. आमच्यासाठी ती आता मेली आहे…”
असे म्हणत त्यांनी सगळी जबाबदारी झटकली. मनिषा तर खूपच घाबरली होती. पण मिलिंद मात्र अजूनही आपल्या निर्णयावर ठाम होता.
दोन दिवसांनी दिवसांनी मिलिंद स्वतः अनिकेतला भेटायला गेला.
एका कॅफेमध्ये दोघे बसले होते.
“तुला मनिषावर प्रेम आहे का?”मिलिंदने विचारलं.
“हो.”अनिकेत म्हणाला,
“मग तिच्याशी लग्न करशील ?” मिलिंद शांतपणे म्हणाला,
“तू खरंच बोलतोयस?” अनिकेत थक्क झाला.
“हो.” एवढे बोलून मिलिंद ने त्याला सगळ्या परिस्थितीची कल्पना दिली. अनिकेतसाठी सगळं काही अविश्वसनीय होतं.
अनिकेतशी बोलल्यावर मिलिंद आणि मनीषाची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली. मामा मामीचा मनिषाला घरात ठेवायला तीव्र विरोध होता. ते तिचा चेहरा बघणे सुद्धा पसंत करत नव्हते. म्हणून घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मनिषाला एखाद्या लेडीज हॉस्टेलमध्ये ठेवावं अस मिलिंदने ठरवलं.
मिलिंद ने स्वतः अनेक हॉटेल बघून एक चांगले हॉटेल मनिषा साठी बघितले. तिथे तिला स्वतःची एक स्पेशल रूम मिळणार होती. बाकी सुविधा सुद्धा चांगल्या होत्या. सगळे खर्च आणि जबाबदारी मिलिंद स्वतः उचलत होता.
हॉस्टेलमधलं आयुष्य मनिषासाठी नवीन होतं. लहानशी खोली… एक पलंग… एक टेबल… आणि खिडकीतून दिसणारा रस्ता. पहिल्या काही दिवसांत ती खूप अस्वस्थ होती. पण आता आपण आणि अनिकेत कायमचे एक होऊ या विचाराने ती आनंदी सुद्धा व्हायची. तिला सतत अनिकेतची आठवण येत होती. त्याच्याशी फोनवर बोलताना ती नेहमी म्हणायची,
” पुढे सगळं नीट होईल ना अनिकेत? आपण लवकरच एक होऊ ना…”
अनिकेत नेहमी म्हणायचा,
“हो… थोडे दिवस थांब. घटस्फोट झाला की लगेच आपण लग्न करू.”
त्या शब्दांनी ती स्वतःला सांत्वना द्यायची.
पण त्याच वेळी तिच्या आयुष्यात अजून एक व्यक्ती सतत उपस्थित होती. मिलिंद.
मिलिंद अजूनही तिचा कागदोपत्री नवरा होता आणि तिची कायदेशीर जबाबदारी सध्या त्याच्यावरच होती. त्यामुळे तो तिची काळजी घेत होता.
अधूनमधून तो तिला भेटायला जायचा.
क्रमशः
मिलिंद आणि मनीषचा खरंच घटस्फोट होईल का ? अनिकेत खरंच मनिषाला मनापासून स्वीकारेल का ? मनिषा तिच्या अनिकेत शी लग्न करण्याच्या
निर्णयावर ठाम राहील का ? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग नक्की वाचा.





