दुसऱ्या दिवशी सकाळीच उषाताईंनी घरातील कामे आटोपली. स्वयंपाक वगैरे करून ठेवणीतील नवी साडी घालून तयार झाल्या. प्रकाशराव सुद्धा तयार झाले होते. त्यांची ही तयारी पाहून आजीला ह्याचं नेमकं काय चाललंय ते कळत नव्हते.
एकतर प्रकाशराव इंदोरहून सरळ आपल्या घरी न येता उषाताईंना आणायला गेले होते. शालू ताईंनी सुद्धा झाल्या प्रकाराबद्दल त्यांच्या आईला काहीच सांगितले नव्हते. आजीला वाटले होते की घरी आणल्यावर प्रकाशराव उषाला नीट वागणार नाहीत. त्यांना सतत टोमणे देतील. बोलणार नाहीत.
पण काल रात्री जेव्हा आजीने घरातील खिडकीतून दोघांनाही रात्री शतपावली करत बोलताना पाहिले तेव्हापासून आजीच्या मनात जरा धाकधूक होतीच. आपण उषाबद्दल त्याच्या मनात इतके भरले तरीही हा तिच्याच बाजूने गेला की काय हा विचार त्यांच्या मनाला स्पर्शून गेला.
त्यातच प्रकाशरावांनी त्यांच्या लाडक्या लेकीबद्दल काहीच गौरवोद्गार काढले नव्हते. त्यांना वाटले होते की प्रकाश आल्याबरोबर शालूचे आणि तिच्या घरच्यांचे गुणगान करेल. शालू ताई त्यांना घेऊन रवीच्या घरी जाणार होती ह्याची कल्पना शालू ताईने आजींना आधीच दिली होती.
मग त्या दृष्टीने विचार केला तर प्रकाशरावांनी उषाला आणायला नको होते. ते ही इतक्या तडक जाऊन आणणे तर खूप कठीण होते. मग एका दिवसात अशी काय जादूची कांडी फिरवली उषाने की प्रकाश तिच्या बाजूने झाला ह्या विचाराने आजी चिडचिड करत होत्या. मग उषाताई समोर आल्यावर आजी त्यांना म्हणाली.
“काय ग… नवीन साडी घालून कुठे चालली आहेस…?”
“नंदिनीच्या सासरी जात आहोत आई…” उषाताई उत्तरल्या.
“काय… अन् प्रकाशला सांगितलेस काय जाण्याबद्दल…? तो कधीच तुला जायची परवानगी देणार नाही…” आजी तावातावाने म्हणाल्या.
“ते सुद्धा येत आहेत सोबत…” उषाताईंनी सांगितले.
“काय…? तो सुद्धा येणार आहे… ज्या मुलीने त्याच्या मानाचा, मर्यादेचा विचार केला नाही त्या मुलीला भेटायला जाणार प्रकाश…?” आजी मोठ्याने म्हणाली.
“हो आई… नंदिनी मुलगी आहे माझी… आणि तिच्या सुखाचा विचार करणं माझं कर्तव्य आहे..” प्रकाशराव मागून येत म्हणाले.
“अरे तू सगळं नाही विसरला आहेस का…? झालेला अपमान आठवत नाही का तुला…?” नंदिनीच्या आजीने विचारले.
“माझा मान अपमान माझ्या मुलीपेक्षा जास्त वरचढ नाही आई… माझ्यासाठी सगळ्यात आधी माझं कुटुंब आहे अन् नंतर बाकीच्या गोष्टी…” प्रकाशराव म्हणाले.
” अरे तू काय बोलतो आहेस… हिने एखादी जादूची कांडी फिरवली का तुझ्यावर… तुला काहीच कसं आठवत नाही आहे… की बायका मुलांच्या पुढे बाकीचं सगळं विसरला आहेस… तुझ्या बहिणीचा अपमान आठवत नाहीये का तुला…” आजी म्हणाली.
“आयुष्यभर मी माझ्या बहिणीला खूप मान दिलाय आई… पण तिने काय केलं माझ्यासोबत… ती आपल्याला काही कुटुंबाचा भाग वगैरे मानत नाही…तिच्यासाठी आपण गरीब, भिकार माणसं आहोत…” प्रकाशराव मोठ्याने म्हणाले.
“काय… काय बोलतो आहेस तू… शालू सतत आपला विचार करत असते… म्हणूनच नाही का तिने नंदिनी साठी एवढं श्रीमंत स्थळ आणलं होतं… तू तर पाहिलं असशीलच ना रवीचं घर..?” आजी नकळतपणे बोलून गेली.
” म्हणजे हे सगळं तुलाही माहिती होतं…?” प्रकाशरावांनी विचारले.
“माहिती आहे असे नाही पण बोलता बोलता सांगितलं तिने..” आजी चाचरत म्हणाली.
” बस्स एवढंच सांगितलं का आणखी काही…” प्रकाशरावांनी विचारले.
“आणखी तर काही नाही… काय झालं…? काही झालंय का…?” आजीला आता काळजी वाटत होती.
आता मात्र प्रकाशराव त्यांच्या आईला सगळं काही सांगणार त्या आधी शालूताईंनी नजरेनेच त्यांना इशारा केला आणि ते गप्प बसले. आता मात्र आजी अस्वस्थ झाली. आजी प्रकाश रावांना म्हणाली.
“मला सांग तुला काय म्हणायचं आहे ते…”
” काही नाही आई… मला जायचं आहे… वेळेवर पोहचलेले बरे… नाहीतर यायला उगाच उशीर व्हायचा… येतो आम्ही…”असे म्हणत प्रकाशराव आणि उषाताई तिथून निघाले.
बाहेर निघाल्यावर प्रकाशरावांनी उषाताईंना विचारले.
” तू का मला थांबवलंस आईला सत्य सांगण्यापासून… एकदा का आईला कळलं असतं तर ती सुद्धा शालूताईला समजून गेली असती…” प्रकाशराव म्हणाले.
” तेच तर नको होतं…” उषाताई म्हणाल्या.
“म्हणजे…?” प्रकाशरावांना न कळल्याने त्यांनी विचारले.
” म्हणजे त्यांना जर शालूताईंचे त्यांच्या माहेराबद्दल असणारे विचार कळले असते तर त्यांना किती वाईट वाटले असते… कोणत्याही आईला आपल्या मुलीबद्दल असे कळले तर तिला वाईटच वाटेल… त्यांना शालूताईंचा खूप अभिमान वाटतो… शालूताई दूर जरी असल्या तरी आईंना त्यांचा खूप आधार वाटतो… आपण जर त्यांना सगळे खरे सांगितले तर त्यांच्यापासून हा आधार हिरावून घेतल्यासारखे होईल… या वयात त्यांना ह्या सगळ्याचा सामना करावा लागणे बरे नाही…” उषाताई म्हणाल्या.
” ह्या दृष्टीने तर मी विचार केलाच नाही… तू किती विचार करतेस ग घरादाराचा… खरं तर तुझ्यामुळे आपल्या घरात आनंद आहे, स्थैर्य आहे… आणि मला आज ह्या गोष्टीची जाणीव होत आहे…” प्रकाशराव म्हणाले.
“ह्यात नवल ते काहीच नाही… कारण प्रत्येक स्त्री आपल्या संसाराचा इतकाच विचार करते… आपल्या घरात आनंद नांदावा ह्याच दृष्टीने त्या आयुष्यभर प्रयत्नशील असतात…” उषाताईंनी सांगितले.
” खरंय तुझं… बायकांचं आयुष्य घराला घरपण देण्यातच निघून जातं आणि आम्ही पुरुष ह्याचं गैरसमजात असतो की बायकांना काय काम असतं… पण त्यांच्या इतकी भावनिक गुंतवणूक करणे पुरुषांना एका जन्मात शक्य होणार नाही…” प्रकाशराव म्हणाले.
आणि मग दोघेही नंदिनीच्या घरी जायला निघाले. सरलाताई आणि नंदिनी दोघीही त्यांची आतुरतेने वाट पाहत होत्या. पण नंदिनीच्या मनात अजूनही थोडी धाकधूक होती. कारण उषाताईंनी फक्त आम्ही भेटायला येतोय एवढेच कळवले होते. पण बाबा अजूनही आपल्यावर रागावलेले असतील ह्या भावनेने नंदिनी जरा घाबरलीच होती.
प्रकाशराव आणि उषाताई अर्ध्या तासात नंदिनीच्या सासरी पोहचले देखील. त्यांना पाहून नंदिनीला खूप आनंद झाला. सरलाताई आणि सुनीलराव सुद्धा आनंदी होते. नकुल ला सुद्धा आज सुट्टी घेऊन घरीच थांबायला सांगितले होते. पण त्याला एक अर्जंट काम असल्याने तो तालुक्याला गेला होता. तो सुद्धा एवढ्यात पोहचणारच होता. सुनीलरावांना पाहून प्रकाशरावांनी हात जोडले. तेव्हा सुनील राव त्यांना म्हणाले.
” अहो हात काय जोडताय मेव्हणे…?”
” कारण माझ्या हातात सध्या तेच आहे… तुम्ही माझ्या मुलीसाठी जे काही केलंय त्यासाठी मी तुम्हाला हात जोडून तुमचे आभारच मानू शकतो… अन् मी तुमच्याशी ज्या कोरडेपणा ने वागलो य त्यासाठी माफी मागू शकतो… यापेक्षा जास्त माझ्या हातात काहीच नाही…” प्रकाशराव म्हणाले.
” असे नका म्हणू… खरं तर तुम्ही तुमची मुलगी आमच्या घरात सून म्हणून दिलीत त्याबद्दल आम्हीच तुमचे आभारी आहोत… पोरीच्या येण्याने घर नुसतं गजबजल्या सारखं वाटतंय… आमची फार इच्छा होती की आम्हाला एखादी मुलगी असती तर छान झाले असते… पण नंदिनीच्या रुपात आम्हाला मुलगी मिळाली…” सुनीलराव म्हणाले.
“हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे भाऊजी… तुम्ही नेहमीच मला माझ्या चांगल्या वाईट काळात साथ दिलीत… भाऊजी असून सुद्धा मोठ्या भावासारखे मदतीला धावून आलात… पण मी मात्र तुमच्या मनाचा मोठेपणा समजू शकलो नाही… माझ्या हातून खूप मोठी चूक घडली…” प्रकाशराव म्हणाले.
” जाऊद्या… चुका आपल्याकडूनच होणार ना… शेवटी आपण माणसे आहोत… पण चूक लक्षात आली की लगेच कबूल करून मोकळं होऊन जायचं हेच आपल्या हातात असतं…” सुनीलराव म्हणाले.
सुनीलरावांचे बोलणे ऐकुन प्रकाशरावांना मनापासून समाधान वाटले. नंदिनीची आई आणि तिची सासू ह्या दोघीसुद्धा आतमध्ये बोलत बसल्या होत्या. नंदिनीला मात्र तिच्या बाबांची काळजी लागून होती. बाबा आल्यावर आपल्याशी बोलायला आले नाही ह्याची हुरहूर तिला लागली होती.
मग जेव्हा ह्यांच्या गोष्टी संपल्या तेव्हा नंदिनीचे बाबा नंदिनीकडे आले…आणि नंदिनी ला विचारले.
“कशी आहेस बाळ…?”
बाबांच्या आवाजात पूर्वीसारखीच काळजी आणि प्रेम जाणवलं नंदिनीला. इतक्या दिवसात मनावर असलेला तिचा ताण निघून गेला होता. उत्तरादाखल ती फक्त चांगली आहे एवढेच बोलू शकली. आज डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले होते. तिच्या बाबांनी तिच्या डोळ्यातील अश्रू पाहिले होते. आपण नंदिनी च्या बाबतीत खूप चुकलो ह्याची जाणीव त्यांच्या मनाला पुन्हा एकदा झाली. तिचे अश्रू पुसत ते म्हणाले.
” आता रडायचं नाही… आता हा तुझा बाप तुला आणखी दुःखात नाही पाहू शकत… मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहीन हे वचन दिले होते पण मी मात्र स्वतःच्या हातानेच तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालो होतो… पण आता नाही… आता हा तुझा बाप काहीही झालं तरी तुझ्या पाठीशी असेल… तुझ्यासाठी तुझ्या माहेरचे दरवाजे नेहमीच खुले राहतील…”
नंदिनीला बाबांचे बोलणे ऐकून खूप आनंद झाला. पण बाहेरून येणाऱ्या नकुल ने सुद्धा त्यांचे बोलणे ऐकले होते. ते ही अर्धवट. त्यामुळे त्याचा असा समज झाला की नंदिनी इथे सुखात नाहीये आणि म्हणूनच तिचे बाबा तिचे अश्रू पुसत तिला तिच्या माहेरचे दरवाजे उघडे आहेत असे म्हणत आहेत. म्हणजे नंदिनी या लग्नाने खुश नसेल का हा विचार त्याच्या मनात डोकावू लागला.
क्रमशः





