एक दिवस पावसात तो तिला भेटायला गेला. उद्या त्यांना काउन्सिलर कडे जायचे होते. त्यासंदर्भात काही सूचना द्यायच्या म्हणून तो तिला भेटायला आला होता. ती हॉस्टेलच्या गेटपाशी उभी होती. मिलिंदकडे एक छत्री होती ती त्याने तिच्या डोक्यावर धरली. आणि तो तिच्यापासून दूर काही अंतरावर भिजत उभा राहिला.
“तुला सर्दी होईल. ही छत्री ठेव तुझ्याकडे.” तो म्हणाला.
“तुम्ही इतके चांगले का आहात ?” आज पहिल्यांदा त्याच्या चांगुलपणाची जाणीव झालेल्या तिने विचारले.
” मी आधीपासून असाच आहे…मला वाईट माणूस बनायला जमत नाही…”मिलिंद म्हणाला,
त्या क्षणी मनिषाच्या मनात मिलिंद बद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार झाला. तिला कळत नव्हते की कुणी इतकं चांगलं कसं काय असू शकतं.
हॉस्टेलच्या त्या छोट्याशा गेटसमोर उभं राहून मनिषा बराच वेळ पावसाकडे बघत होती. पावसाचे थेंब रस्त्यावर पडत होते आणि त्यातून उडणारे छोटे छोटे तुषार जणू तिच्या मनातल्या गोंधळासारखे वाटत होते.
तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की मिलिंदने इतक्या सहजपणे तिचं सत्य स्वीकारलं आणि आपण त्याच्याशी इतकं वाईट वागूनही आज तोच आपल्या मदतीसाठी उभा आहे.
त्याच्या जागी कुणी दुसरा असता तर त्याने किती तमाशा केला असता. तिला चारित्र्यहीन ठरवून घरातून काढून दिले असते. पण त्याने ह्यातलं काहीच न करता तिला समजून घेतलं. तिच्या आई वडिलांनी सुद्धा तिच्या मनाचा कधी एवढा विचार केला नव्हता जेवढा मिलिंदने केला होता.
एखादा दुसरा माणूस असता तर कदाचित संतापला असता… अपमान केला असता… किंवा जबरदस्तीने नातं टिकवण्याचा प्रयत्न केला असता.
पण मिलिंद तसं काहीच करत नव्हता. तो शांत होता. अविचल होता. आणि कदाचित म्हणूनच मनिषाच्या मनात त्याच्याबद्दल एक प्रेमळ भावना निर्माण होऊ लागली होती.
मिलिंद दर दोन-तीन दिवसांनी तिला भेटायला यायचा. कधी कागदपत्रांसाठी… कधी फक्त तिची चौकशी करायला. एकदा तो आला तेव्हा त्याच्या हातात एक छोटं पॅकेट होतं.
“हे काय?” मनिषाने विचारलं.
“तुझ्यासाठी,” तो म्हणाला.
तिने पॅकेट उघडलं.
त्यात एक सुंदर डायरी आणि पेन होतं.
“डायरी का पण?” तिने विचारले.
“मला वाटलं तुला हॉस्टेल मध्ये कंटाळा येत असेल म्हणून. मनातलं लिहिलंस तर बरं वाटतं.” मिलिंद म्हणाला,
ती काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. इतकी साधी पण विचारपूर्वक भेट होती ती. त्या दिवशी रात्री तिने डायरीत पहिलं वाक्य लिहिलं.
“मिलिंद खरंच खूप चांगले आहेत. या जगात चांगली माणसं सुद्धा असतात हे त्यांना भेटून कळलं…”
हळूहळू मिलिंद आणि मनीषाच्या भेटी वाढत गेल्या. मिलिंद मैत्रीच्या नात्याने मनिषाला भेटायचा तर मनिषाला आता त्याला भेटून छान वाटायला लागले होते. कधी ते जवळच्या चहाच्या टपरीवर चहा प्यायचे. कधी पार्कमध्ये बसून गप्पा मारायचे.
एकदा काउन्सिलर कडून येताना कॉफी पिण्यासाठी म्हणून ते दोघे एका छोट्या कॅफेमध्ये बसले होते.
मनिषा कॉफी ढवळत म्हणाली,
” तुम्हाला खरंच माझा राग येत नाही का मिलिंद ?”
“राग येतो ना.. कधीकधी येतो राग…” मिलिंद म्हणाला.
ती चकित झाली.
“मग?”
“पण राग करून काय होणार? जे झालं ते बदलता येणार नाही. आणि कुणाच्या मनात आपल्याबद्दल जबरदस्ती प्रेम निर्माण करता येत नाही.” तो म्हणाला.
हे ऐकून ती शांत झाली.
काही क्षणांनी ती म्हणाली,
“तुम्ही खरंच खूप चांगले आहात..”
“तेच माझं दुर्दैव आहे कदाचित.” मिलिंद किंचित हसत म्हणाला,
त्याचे बोलणे ऐकल्यानंतर ती विचारत पडली.
“काय विचार करतेयस?” त्याने विचारलं.
“आयुष्य किती विचित्र असतं ना?”ती म्हणाली.
“का?”
“जर माझ्या घरच्यांनी मला अनिकेतशी लग्न करू दिलं असतं तर कदाचित मी तुला कधी भेटलेच नसते.” मिलिंद हसला.
“कधी कधी चुकीचे निर्णयही आपल्याला योग्य माणसांपर्यंत पोहोचवतात.” ती त्याच्याकडे बघत राहिली.
त्या क्षणी तिच्या मनात काहीतरी हललं. त्या रात्री मनिषा झोपू शकत नव्हती. तिला सतत मिलिंदची आठवण येत होती. तो हसताना कसा दिसतो…तो शांतपणे कसा बोलतो…तो तिची काळजी कशी घेतो…
आपण त्याचा विचार करतोय ह्याची जाणीव झाल्यावर तिने स्वतःलाच विचारलं,
“मी हा काय विचार करते आहे?”
तिचे अनिकेतवर प्रेम होते. त्यामुळे तिने मिलिंदबद्दल येणारे विचार मनातून काढून टाकले. अनिकेत वर तिचं असलेलं हे प्रेम सत्य होतं.पण तरीही मिलिंद तिच्या मनात का येत होता? हे तिला कळत नव्हते.
काही दिवसांनी ती अनिकेतला भेटायला गेली. एका कॅफेमध्ये ते भेटले.
अनिकेत थोडा घाईत दिसत होता. फोनवर सतत काहीतरी मेसेज येत होते.
“काय झालं?” तीने विचारले.
“ऑफिसचा खूप ताण आहे माझ्यावर सध्या.” तो म्हणाला.
“थोडे दिवस अजून… मग आपण कायमचे एकत्र असू. मग मी तुझा ताण कमी करेन.” ती हसून म्हणाली.
अनिकेतने मान हलवली. पण त्या दिवशी त्याच्या चेहऱ्यावर आधीसारखा उत्साह नव्हता. ती थोडी अस्वस्थ झाली. त्या रात्री हॉस्टेलमध्ये वीज गेली होती. मनिषा खिडकीत उभी होती. अचानक तिचा फोन वाजला. मिलिंदचा फोन होता.
“तू ठीक आहेस ना?” त्याने विचारलं.
“हो.” ती म्हणालं.
“इथे जोरदार पाऊस आहे. म्हणून विचारलं.”
ती हसली.
“तुम्ही माझी इतकी काळजी का करता? जिथे माझ्या सख्ख्या आई वडिलांना माझी काळजी नाही तिथे तुम्ही नेहमी माझ्यासाठी उभे असता..”
मिलिंद काही क्षण शांत राहिला.
मग म्हणाला,
“कदाचित सवय झाली आहे तुझी काळजी घ्यायची. ”
त्या शब्दांनी तिच्या मनात काहीतरी हललं.
त्या क्षणी दोघांनाही काहीतरी जाणवलं.
पण कोणीही काही बोललं नाही. मिलिंदला जाणीव होती की ती त्याची नव्हती. तिचं त्याच्यावर प्रेम नाही ही जाणीव सतत त्याच्या मनात बोचत रहायची.
आयुष्य आपल्या गतीने सुरू होतं. एके दिवशी ऑफिसमध्ये मिलिंदला एक धक्कादायक बातमी समजली. त्याची सहकारी मेघना…जिचं लग्न आठ दिवसांवर आलं होतं. ते अचानक तुटलं होतं. ती पूर्णपणे खचली होती. काही दिवसांनी त्याला समजलं की तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. हे ऐकून मिलिंद हादरला.
त्याने ठरवलं — तिला भेटायला जायचं. तो मेघनाला भेटायला तिच्या घरी गेला. मेघनाच्या घरात वातावरण खूप उदास होतं. तिचे आई-वडील चिंतेत होते. मेघना खोलीत शांत बसली होती. तिच्या डोळ्यांत पाणी होतं.
मिलिंद आल्यावर ती त्याला भेटायला हॉल मध्ये आली. सतत उत्साहाने वावरणारी मेघना आज खूप उदास होती. अगदी जीव नसल्यासारखी वावरत होती.
“तू ठीक आहेस ना?” तो म्हणाला.
“हो… मी ठीक आहे.” ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली,
पण तिच्या आवाजातली वेदना लपली नव्हती. काही वेळ शांतता होती.
तिला एवढं दुखी पाहून मिलिंद ने मनात विचार केला की हीच लग्न तुटल्यामुळे हिला आणि हिच्या कुटुंबाला किती काय काय सहन कराव लागत आहे. जर हिचं लग्न झालं तर हिचा आणि हिच्या घरच्यांचा प्रॉब्लेम सॉल्व होईल. शिवाय आज ना उद्या आपल्याला ही दुसरं लग्न करावं लागेलच. मग मेघनाशीच लग्न केलं तर.
मेघना चांगली मुलगी आहे आणि तिला मी कितीतरी वर्षांपासून ओळखतो जर कोणी ना कोणी आपल्या आयुष्यात येणारच असेल तर मग मेघना का नाही. त्याचं मनीषावर खूप प्रेम होतं पण ती त्याची कधीच होणार नाही हे त्याला माहीत होतं. त्याला सुद्धा आयुष्यात पुढे जावंच लागणार होतं. मिलिंद थोडा वेळ विचार करत राहिला आणि मग अचानक मिलिंदच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
“मेघना…तुला काही हरकत नसेल तर काही बोलू…?”
” बोल ना…” मेघना निर्जीवपणे म्हणाली.
” तुला काही हरकत नसेल तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे..”
मिलिंदच्या त्या शब्दांनी खोलीत एकदम शांतता पसरली.
मेघना स्तब्ध झाली. तिचे आई-वडीलही एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. काही क्षण कोणीही काही बोललं नाही.
क्रमशः





