“का..? काय झालं..? ती तुमची मैत्रीण असून तुमच्या सोबत येऊ शकते तर मी बायको असून का नाही येऊ शकत…?” नंदिनी चिडून म्हणाली.
“अगं ह्यात बायको आणि मैत्रिण हा विषय आहे का…? एक साधी गोष्ट होती… जाऊन आलो असतो ना लगेच… पण सगळ्यांसमोर म्हणालीस मी जाऊ का..? सगळ्यांनी काय विचार केला असेल…?” नकुल म्हणाला.
“सगळ्यांनी का तुमच्या त्या मैत्रिणीने… तिचीच काळजी वाटतेय ना तुम्हाला…?” नंदिनी म्हणाली.
“अगं तू काय बोलतेस मला काहीच कळत नाहीये… सरळ सांगणार आहेस का तुला काय म्हणायचंय ते… का अशी विचित्र वागत आहेस…?” नकुल चिडून म्हणाला.
नंदिनी काही बोलणार इतक्यात रस्त्याने तिचे बाबा गाडीने येताना तिला दिसले. आणि ती एकदमच गप्प बसली. नंदिनीच्या जवळ आल्यावर प्रकाशरावांना नंदिनी आणि नकुल एका जागी दिसले. त्यांना पाहून ते म्हणाले.
“अरे… तुम्ही दोघे इथे काय करताय…?”
“काही नाही बाबा… ते जरा…”नंदिनी बोलताना अडखळत होती. मग पुढे ती तिच्या बाबांना म्हणाली.
“तुम्ही इथे जसे काय…?”
“तुझी आठवण आली म्हणून तुला भेटायला आलो…”
नकुल सुद्धा मग त्याचा राग बाजूला ठेवत म्हणाला.
“चला ना मामा… घरी जाऊयात…”
मग नकुल आणि नंदिनीची गाडी पुढे पुढे आणि प्रकाशरावांची गाडी त्यांच्या मागे असे तिघेजण घरी पोहचले. प्रकाश रावांशी जुजबी बोलून आणि थोडावेळ घरी थांबून नकुल पुन्हा शेताकडे जायला निघाला. नंदिनी अजूनही खूप रागात होती. तिला नकुलचे मघाशी तिच्यावर चिडून बोलणे अजिबात आवडले नव्हते.
शेतात पोहचल्यावर सगळ्यांनी नकुलला नंदिनी बद्दल विचारले. तेव्हा त्याने सांगितले की तिचे बाबा अचानक घरी आलेत म्हणून ती घरीच थांबली आहे. मुग्धाला मात्र या दोघांमध्ये काहीतरी घडल्याचा संशय आला. पण इथे सगळेच असल्याने ती काहीच बोलली नाही.
शेतात जेवण सुरू होते. सगळेच हसत बोलत जेवत होते पण नकुल मात्र जरा शांतच होता. आपण नंदिनीला जरा जास्तच बोललो ह्याची जाणीव त्याला झाली होती. त्याने ठरवले की इथून घरी गेल्याबरोबर नंदिनीशी बोलायचे. तिच्या मनात नेमके काय चाललेय ह्याचा अंदाज घ्यावा.
तसेही मागच्या काही दिवसांपासून तो तिच्याशी तुसडेपणाने वागत होता. त्याला कारणही नंदिनीच होती. नकुलला सारखेच वाटायचे की नंदिनीला स्वतःहून त्याच्याशी बोलण्याची इच्छा होत नाही. आपल्या आईच्या सांगण्यावरून अन् तितकेच मोजून मापून ती आपल्याशी बोलते असे त्याला सारखे वाटायचे.
त्याचे तिच्यावर प्रेम होते आणि तिच्याकडून काही अपेक्षा सुद्धा होत्या. त्याला वाटायचे तिने सतत आपल्या आजूबाजूला असावे. आपल्याशी बोलावे. प्रेम नाही तर निदान मैत्रीची सुरूवात तरी करावी. तरी आज तो ज्या पध्दतीने तिच्याशी बोलला ती पद्धत त्याला चुकीची वाटली होती.
घरी जाऊन तो याबद्दल तिची माफी मागणार होता आणि तिच्या मनात नेमके काय चालले आहे त्याबद्दल सुद्धा विचारणा करणार होता. शेतातील जेवणं आटोपली. नकुल ने सगळी आवराआवर करू लागली. संध्याकाळी तो घरी गेला. आज घर जरा शांत शांत वाटत होतं. तो त्याच्या आईजवळ गेला आणि म्हणाला.
“आई… प्रकाश मामा गेलेत का ग…?”
“हो रे… आता थोडाच वेळ झाला ते जाऊन… ते म्हणत होते की नकुल येईपर्यंत थांबतो म्हणून… पण मीच म्हटलं की मग अंधार होईल घरी पोहचायला…” त्याची आई म्हणाली.
“अच्छा… आणि नंदिनी कुठे आहे…?” नकुल ने विचारले.
“नंदिनी सुद्धा गेली तिच्या बाबांसोबत… लग्न झालं तेव्हापासून ती एकदाही गेली नव्हती ना मग तिच्या बाबांनी न्यायचा विषय काढल्यावर मीच म्हटलं जाऊन ये…”त्याची आई म्हणाली.
“काय…? नंदिनी माहेरी गेली…?”
“हो… तिने सांगितले नाही का तुला…? मला वाटलं तिने फोन करून सांगितले असेल…”
“अगं माझा फोन चार्जिंग नसल्याने बंद पडला होता… म्हणून लागला नसेल..”. नकुल उसने हसू चेहऱ्यावर आणत म्हणाला.
पण त्याला माहिती होते की नंदिनी ने आपल्याला फोन केलाच नसेल. आपल्या मघाच्या बोलण्याच्या तिला राग आलाय हे त्याला माहिती होते. मग ती पुढे त्याच्या आईला म्हणाला.
“कधी येणार आहे काही सांगितलंय का तिने…?”
“तसं काही नाही सांगितलं… पण तू विचार तिला फोन करून…”आई म्हणाली.
आता मात्र नकुल हिरमुसला. नंदिनी कधी येईल हे सुद्धा त्याला माहीत नव्हते. त्याने नंदिनीला फोन केला. पण तेव्हा तिने तो फोन उचलला नाही. त्याला वाटले नंदिनी पोहचली नसेल अजुन म्हणून फोन उचलला नसेल. थोड्या वेळाने फोन करू म्हणून तो तात्पुरता थांबला.
इकडे नंदिनी घरी पोहचली. लग्नानंतर इतक्या दिवसांनंतर घरी आल्याने नंदिनी खूपच आनंदात होती. तिच्या आईला ही खूप आनंद झाला. कधी नव्हे ते तिच्या आजीने प्रेमाने तिला जवळ घेतले. तिची दृष्ट काढली. आपल्या आजीला इतकं बदललेलं पाहून नंदिनीला खूप आश्चर्य वाटले.
ह्या सगळ्यात नंदिनीने तिचा फोन पाहिलाच नाही. रात्री उशिरा जेव्हा फोन पहिला तेव्हा त्यावर नकुलचा कॉल आलेला दिसला. पण ह्यावेळी तर नकुल झोपतो सुद्धा हे आठवून तिने त्याला फोन केला नाही. मघाचा राग सुद्धा होताच. मग तिनेही त्याला इतक्या रात्री फोन केलाच नाही.
तिकडे नकुल मात्र तळमळत होता. तिच्या फोनची वाट पाहत जागाच होतं. मग त्याने स्वतःच तिला फोन केला. त्याचा फोन आलेला पाहून तिला आनंद झाला. मग मघाचे सगळे आठवून ती जरा रागानेच त्याला हॅलो म्हणाली.
“झोपली नाहीस अजून… म्हणजे इतका उशीर झालाय म्हणून…”नकुल म्हणाला.
“नाही… आता झोपणारच होते… आई अन् आजीच्या गप्पा सुरू होत्या म्हणून जरा उशीर झाला झोपायला…”नंदिनी म्हणाली.
“अच्छा…” नकुल.
“तुम्ही पण नाही झोपलात अजुन…?” नंदिनी ने विचारले.
“तुझ्या फोन ची वाट पाहत होतो…”नकुल नकळतपणे बोलून गेला.
यावर काय बोलावं हे न सुचल्याने नंदिनी म्हणाली.
“मी खूप उशिरा पाहिला फोन म्हणून…”
“तू माहेरी जाणार आहेस हे मला सांगितलं सुद्धा नाहीस…”नकुलने विचारले.
“ते एकदम वेळेवर ठरलं… आणि तुम्ही खूप बिझी होते तुमच्या मैत्रिणीसोबत…” नंदिनी म्हणाली.
“मी मघाशी तुझ्याशी जरा जास्त मोठ्याने बोललो… त्याबद्दल खरंच खूप सॉरी… मी असे बोलायला नको होते…” नकुल म्हणाला.
त्यावर नंदिनी ने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मग नकुल सुद्धा फार काही बोलला नाही. दोघांनीही जुजबी बोलून फोन ठेवून दिला.
आपण उगाच नंदिनीला जास्त बोललो ह्याचे त्याला खूप वाईट वाटत होते. त्यांच्यात जास्त सुसंवाद नसला तरी तिचा आजूबाजूला असलेला वावर सुद्धा त्याला सुखावून जायचा. पण आपण मात्र तिने पुढाकार घ्यावा ह्या नादात तिच्याशी जरा कोरडेपणाने वागू लागलो होतो ह्याची जाणीव त्याला होत होती.
नंदिनीचे दोन तीन दिवस एकदम मजेत गेले माहेरी. आईच्या हातचे गरमागरम जेवण, आजीचे लाड, लहान भावासोबत लुटुपुटूचे भांडण, बाबांचं कौतुक आणि रोज मैत्रिणींची होणारी भेट ही तिच्यासाठी मेजवानीच होती. पण त्यानंतर मात्र तिला नकुल च्या भेटीची ओढ लागली.
तिचा राग दूर होऊन आता तिला आपण गोष्ट उगाच ताणल्याची जाणिव झाली. नंदिनी जरा नाराज नाराज दिसत होती. उषाताईंनी तिची ही गोष्ट हेरली होती. पण त्या नंदिनी स्वतःहून काही सांगते का ह्याची वाट पाहत होत्या.
इकडे सुजाता चे सासू सासरे मात्र खूप काळजी घ्यायला लागले होते. इतके की सुजाताला वाटायचे की हे लोक जणू कोणी वेगळेच आहेत. अर्थातच ह्यामागील कारण त्यांच्या मुलाच्या तिच्या पोटात वाढणारा वंश होता. त्यांचे सुजातावर प्रेम वगैरे दाटून आलेले नव्हते.
पण सुजाता साठी हीच गोष्ट खूप मोठी होती. आपला नाही निदान आपल्या होणाऱ्या बाळाचा कुणीतरी विचार करतंय ही तिच्यासाठी आनंदाची बाब होती. इतक्या दिवसांत तिने अनेक दुःखे पाहिली होती. पण तिच्या बाळाच्या तिच्या आयुष्यात येण्याची चाहूल ही त्या सगळ्या दुःखांवर फुंकर घालणारी होती.
पण सुजाता चा हा आनंद कुणालातरी पाहवला जात नव्हता. ती होती रवीची बहीण रेवा. रेवाचे लग्न त्याच शहरात झाले होते. तिला सुद्धा दोन मुले होती. आपल्या आईवडिलांची सुजाता आणि तिच्या बाळाप्रती असलेली काळजी तिला अजिबात आवडायची नाही. तिच्या मते तिला दोन मुलं असताना त्यांनी आणखी कोणत्या नातवंडाची आस कशाला ठेवावी.
त्यांना तिच्या मुलांपेक्षा सुजाताचं होणारं मुलं जास्त प्रिय होत आहे असे तिला वाटायचे. रवीनंतर तिच्या बाबांच्या सगळ्या संपत्तीची आता तीच निर्विवाद वारस आहे हे तर जवळजवळ स्पष्टच होते. पण उद्या बाळ झाल्यावर सुजातानेही तिचा हक्क मागितला तर काय होईल.
आता तिला माहेरी पाठवले तर निदान ती चुपचाप त्यांच्या आयुष्यातून निघून तरी गेली असती. पण उद्या चालून ती या घरातून निघून गेली नाही तर. तिचे आई बाबा आधी सुजाताचा खूप राग करायचे पण आता तर एखादा चमत्कार झाल्यासारखे तिच्या मागेपुढे करतात हे तिला सहन व्हायचे नाही. तिने याबद्दल आपल्या आई बाबांशी बोलायचे ठरवले.
एकदा रेवा तिच्या माहेरी असताना तिची आई सुजाताला दवाखान्यातून घरी घेऊन आली. सुजाताच्या हॉस्पिटलच्या फाईलवर नजर जाताच रेवा मोठ्याने ओरडत म्हणाली.
“काय हे आई… तू सुजाताला ह्या दवाखान्यात घेऊन गेली होतीस…? अगं हा तर इथला सगळ्यात मोठा आणि महाग दवाखाना आहे ना…”
“हो… पण का… काय झालं…?” आईने आश्चर्याने विचारले.
“अगं एखाद्या साधारण आणि स्वस्त दवाखान्यात नेले तरी चालेल… कशाला एवढा पैसा उधळायचा…?” रेवा म्हणाली.
“मग काय झाले…? तुला सुद्धा तिथेच नव्हते का नेले… आपला आधीचा खूप चांगला अनुभव आहे तिथला…”
क्रमशः


