लग्नमंडपात गजबज होती. सगळीकडे फुलांची सजावट, रोषणाई आणि गाण्यांचा आवाज. पाहुणे एकमेकांशी गप्पा मारत होते. मुलं इकडेतिकडे पळत होती. वातावरणात आनंद होता.
आज मिलिंदचं लग्न होतं. मिलिंद शांतपणे स्टेजवर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. पण त्याच्या डोळ्यांत मात्र एक विचित्र शांतता होती. पाहुणे येत होते, अभिनंदन करत होते.
तेवढ्यात मंडपाच्या प्रवेशद्वारातून एक मुलगी आत आली. साधी साडी…मोकळे केस… चेहऱ्यावर हलकंसं हसू. तिला पाहताच काही लोक कुजबुजायला लागले.
“अरे… ही मनिषा आहे ना?”
“हो…ही मिलिंदची पहिली बायको मनिषाच आहे!”
क्षणात वातावरणात एक विचित्र शांतता पसरली. पण मनिषा अगदी सहज चालत आत आली. मिलिंदची नजर तिच्यावर पडली. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. पण पुढच्याच क्षणी तो सुद्धा सहजपणे उठून तिच्याकडे गेला.
“कशी आहेस?” त्याने विचारलं.
ती हसली.
” बरी आहे…तुम्ही कसे आहात ?” तिने विचारले.
” मी पण बराआहे..”
दोघांचं ते सहज बोलणं पाहून सगळेच थक्क झाले. कारण फक्त सहा महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. आणि आज मिलिंदचं दुसरं लग्न होत होतं.
सहा महिन्यांपूर्वी:
मिलिंदचं आयुष्य फार साधं होतं. तो एका मोठ्या कंपनीत इंजिनियर होता. कामावरून घरी येणं, मामा-मामींसोबत जेवण, आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी ऑफिस. मिलिंद स्वभावाने खूप चांगला मुलगा होता. दुसऱ्याचं दुःख हे स्वतःच समजून नेहमी सगळ्यांच्या मदतीला जायचा. दुसऱ्यांच्या सुखात सुखावून जायचा.
त्याचं आयुष्य अगदीच शांत होतं. मिलिंदचे आईवडील लहानपणीच गेले होते. त्यामुळे मामा-मामींनीच त्याला वाढवलं होतं. मामा मामी ने त्याला सुद्धा स्वतःच्या मुलाप्रमाणेच लहानाचे मोठे केले होते. मामी नेहमी प्रेमाने म्हणायच्या,
“आता मिलिंदचं लग्न लावलं की आमची जबाबदारी संपली.”
एक दिवस मामा घरी आले आणि म्हणाले,
“मिलिंद, आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी पाहिली आहे. माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांनी हे स्थळ सुचवलं आहे. सध्या तर मुलीचा फोटो बघितल्यावर ती मला चांगली वाटली आहे. परवा सुट्टी असेल तर बघून पण येऊ…”
“तुम्हाला आवडली असेल तर मला काही हरकत नाही मामा.” मिलिंद म्हणाला.
“खूप सुंदर आणि सुसंस्कृत मुलगी आहे. तुमचा संसार सुखाचा होईल बघ..” मामी हसून म्हणाल्या.
दोन दिवसांनी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला. मनिषा चहाचा ट्रे घेऊन हळूच हॉलमध्ये आली. मिलिंदने तिच्याकडे पाहिलं. ती खूप सुंदर होती.
तिचे टपोरे, भावपूर्ण डोळे जणू काळ्या ढगांत चमकणाऱ्या विजेची शांत लकेर. चाफेकळीप्रमाणे नाजूक आणि सरळ नाक तिच्या चेहऱ्याच्या सौंदर्याला अधिकच उठाव देणारं. गुलाबाच्या पाकळ्यांसारखे कोमल ओठ, आणि त्यावर उमटणारं मंद हास्य म्हणजे एखाद्या पहाटेचं पहिलं सोनसळी किरण. तिचे रेशमी केस वाऱ्यावर अलगद झुलताना जणू काळ्या धबधब्याचीच आठवण करून देत.
गालांवर उमटणारी हलकी खळी तिच्या निरागस सौंदर्याला मोहक स्पर्श देणारी. तिचं संपूर्ण रूप म्हणजे निसर्गाने निवांत वेळ काढून रेखाटलेली एक जिवंत कलाकृतीच भासावी. पिवळ्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. पण तिच्या डोळ्यांत मात्र एक विचित्र शांतता होती. तिला पाहून मिलिंद तिच्याकडे पाहतच राहिला.
” बाकीची बोलणी आम्ही करतो…बाकी एकमेकांची पसंत वगैरे तुम्ही दोघांनी सुद्धा थोडं बोलून घ्या.”मामी म्हणाल्या,
घरच्यांची परवानगी घेऊन ते दोघे गॅलरीत गेले. काही क्षण शांतता पसरली. मनिषा काही बोलत नव्हती म्हणून मग मिलिंदने बोलायला सुरुवात केली. काय बोलावं हे कळत नव्हतं. ते पहिल्यांदा कुण्या मुलीशी असे बोलणार होता. तेही इतक्या सुंदर मुलीशी. तिला पाहून आधीच तो मंत्रमुग्ध झाला होता. तरीही तो हिंमत एकवटून म्हणाला.
“तुला हे लग्न मान्य आहे ना?”मिलिंद म्हणाला,
मनिषा क्षणभर थांबली. तिला ह्या प्रश्नाची अपेक्षा नव्हती. तिने आधी भिरभिर नजर फिरवली. मग थोडी शांत झाली आणि मग हलक्या आवाजात म्हणाली,
“हो. मला मान्य आहे. ”
“मग ठीक आहे.”मिलिंद हसत म्हणाला.
यापुढे त्याने तिला एकही प्रश्न विचारला नाही. त्याला काही विचारायची गरजच वाटली नाही. त्याला काय माहिती होतं की तिच्या त्या एका शब्दामागे किती मोठं सत्य लपलं आहे.
मिलिंदला मनिषा मनापासून आवडली होती. त्याने जशा बायकोचं स्वप्न पाहिलं होतं मनिषा अगदी तशीच होती. काही दिवसांतच लग्न ठरलं. आणि मोठ्या थाटामाटात लग्न झालं. सगळे आनंदात होते. मिलिंदच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात झाली होती. पण मनिषाच्या मनात मात्र वादळ होतं. जे आता मिलिंदच्या आयुष्यात येणार होतं.
लग्नानंतरची पहिली रात्र होती. मधुचंद्राची रात्र. मिलिंद थोडा संकोचलेला होता. मनिषा पलंगाच्या काठावर बसली होती. तो तिच्या जवळ जाऊन बसला. काहीतरी बोलायचं म्हणून आधी त्याने अलगद तिचा हात हातात घेतला आणि बोलू लागला.
“मनिषा…”
त्याने हात पकडलेला पाहून तिने त्याचा हात झटकला. ती अचानक उठली आणि थोडी दूर जाऊन उभी राहिली.
तिच्या या वागण्याने मिलिंद चकित झाला.
“काय झालं?” त्याने विचारलं.
तिच्या डोळ्यांत पाणी आलं.
“मिलिंद… मला माफ करा…मी तुमची नाही होऊ शकत.” ती म्हणाली.
“का?” त्याने आश्चर्याने विचारले.
“कारण… माझं तुमच्यावर प्रेम नाही.” ती थरथरत म्हणाली.
तिचे बोलणे ऐकून मिलिंद हादरलाच.
“मग?”
“माझं दुसऱ्या कुणावर प्रेम आहे…अनिकेत आहे त्याच नाव.” ती हळू आवाजात म्हणाली,
मनीषाचे बोलणे ऐकून मिलिंदला मोठा धक्का बसला. त्याने पाहिलेलं सुखी संसाराचं स्वप्न धुळीस मिळालं होतं. त्याला मनापासून मनिषा आवडली होती. तिला पाहताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडला होता. आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीच हे प्रेमभंगचा दुःख. त्या क्षणी मिलिंदसाठी जणू सगळं जग थांबलं होतं. आजवर कधीच कोणाच साधं वाईट न चिंतलेल्या त्याच्या आयुष्यात हे एवढं वाईट व्हावं ही विडंबनाच होती.
मनिषाने मिलिंदला सगळं सांगितलं. ती आणि अनिकेत कॉलेजमध्ये भेटले होते. त्यांचं प्रेम वाढलं. पण जात वेगळी असल्यामुळे तिच्या घरच्यांनी त्यांचा संबंध मान्य केला नाही. तिला घरात कोंडून ठेवलं होतं. बाहेर जायला बंदी केली होती. तिचा फोन हिसकावून घेण्यात आला होता. तिला घरच्यांनी मारहाण सुद्धा केली होती.
“त्यांनी जबरदस्तीने तुमच्याशी माझं लग्न लावून दिलं,” ती म्हणाली.
मिलिंद शांत बसला होता. तो तडक त्याच्या रूम मधून निघून घरच्या बाहेर गेला. गाडीत बसला. त्याच्या मनात हजारो विचार चालू होते. तो गाडी घेऊन बराच दूर गेला. एका पुलावर जाऊन रात्रभर बसला.
त्याला सगळं काही आठवत होतं. तिला पहिल्यांदा बघितलं तो दिवस. लग्नाचे मखमली दिवस. तिच्यासोबत पाहिलेले संसाराचे स्वप्न. सगळं काही धुळीस मिळालं होतं. त्याच्याजागी इतर कुणी असतं तर मनिषाला नको नको ते बोलला असता. तिला दोष दिला असता. पण मिलिंद ने असे काहीच केले नाही. त्याने स्वतःशीच काहीतरी विचार केला आणि तो सकाळ होताच घरच्या दिशेने निघाला.
क्रमशः





